नवी दिल्ली : प्रमुख खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर गेले आहेच; पण त्यांच्या ठिकाणी कोणाला संधी द्यायची, अशी भारतीय संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे.
हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा पराभव झालेला असला, तरी जडेजा आणि राहुल यांनी आपले योगदान दिले होते. त्यामुळे त्यांची उणीव भारतीय संघाला निश्चितच जाणवणार आहे. या सामन्यात एक चोरटी धाव घेताना धावचीत झालेल्या जडेजाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, तर राहुलच्या उजव्या पायाच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला आहे.
मुळात विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतलेली आहे. त्यात आता जडेजा आणि राहुलच्या दुखापतीमुळे चिंता वाढली आहे. येत्या शुक्रवारपासून दुसरा कसोटी सामना विशाखापट्टण येथे सुरू होत आहे. त्यात कोणाला संधी द्यायची, यासाठी संघ व्यवस्थापनाला मोठा खल करावा लागणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे पर्याय आहेत; परंतु त्यातून योग्य निवड महत्त्वाची ठरणार आहे. केएल राहुलच्या ठिकाणी रजत पाटीदार याची निवड निश्चित वाटत असली, तरी सर्फराझ खानही शर्यतीत आहे.
जडेजाच्या जागेवर सौरव कुमार की वॉशिंग्टन सुंदर असे नवे पर्याय तयार झाले असले, तरी कुलदीप यादवचे पारडे जड आहे. शेवटी इंग्लिश खेळाडू स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा वापर सढळ हस्ते करणार हे उघड आहे. त्या खेळाला उत्तर देण्याची चांगली क्षमता असेल त्यालाच प्राधान्य मिळू शकते.
इंग्लंडने पहिल्या कसोटीत केलेल्या प्रयोगानुसार भारत दुसऱ्या कसोटीत कदाचित एकच वेगवान गोलंदाजासह खेळू शकेल. तसेही मोहम्मद सिराजला पहिल्या कसोटीत अधिक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती आणि जेवढी गोलंदाजी केली त्यात त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन कदाचीत त्याच्याऐवजी आणखी एक फिरकी गोलंदाज खेळवण्याचा विचार करू शकतो
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.