न भूतो न भविष्यती; अंबानीच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटी नव्हे तर या खास गोष्टींची चर्चा

लाडक्या मुलाच्या लग्नानिमित्त जगभरात अंबानी कुटुंबाने भारताची एक वेगळी ओळख निर्माण केली, असं म्हणायला हरकत नाही.
Ambani grand wedding
Ambani grand wedding
Updated on

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं. 12 जुलै रोजी या जोडप्यानं लग्नगाठ बांधली, मात्र त्यांच्या लग्नाच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. कारण हा संपूर्ण सोहळा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत चर्चेत राहिला. हे लग्न केवळ एका दिवसाचं नव्हतं. लग्न गाठ बांधल्यानंतरही अनेक भव्य सोहळे पार पडले. लग्नानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद आणि त्यानंतर 14 जुलै रोजी मंगल उत्सव म्हणजे स्वागत समारंभ पार पडला. त्यांचा हा लग्न सोहळा ''न भूतो न भविष्यती'' असा होता.

त्यांच्या लग्नाच्या आमंत्रित पाहुण्यांच्या यादीत जगभरातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय आयकॉन, व्यावसायिक, राजकारणी आणि क्रीडा जगतातील अनेक पाहुणे आणि मान्यवर सहभागी झाले होते. त्यामुळे जगभरात अंबानी कुटुंबाने भारताची एक वेगळी ओळख निर्माण केली, असं म्हणायला हरकत नाही.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या या लाडक्या मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. मार्चमध्ये मूळ गावी जामनगर येथे तीन दिवसीय प्री-वेडिंग पार्टी झाली. त्यावेळीदेखील अनेक मोठी लोकं उपस्थित होती. रिहाना, एकॉन आणि दिलजीत दोसांझ यांनी उपस्थितांचं मनोरंजन केलं. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांसारखे अनेक अब्जाधीश सहभागी झाले होते. जूनमध्ये, 'इटली ते फ्रान्स' दरम्यान नेत्रदीपक लक्झरी क्रूझने गेलेल्या व्हीआयपी पाहुण्यांना केटी पेरी आणि बॅकस्ट्रीट बॉईज यांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध केलं.

इतकचं काय तर मुलाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यातही अंबानी कुटुंब कुठेही मागे पडलं नाही. आलेल्या पाहुण्यांना कोट्यावधींच्या भेटी देऊन चकित करून टाकलं. पाहुण्यांसाठी खासगी चार्टर फ्लाइटची सुविधा करण्यात आली होती. लुई व्हिटॉन बॅग, सोन्याच्या चैन, 2 कोटींची घड्याळ, सोन्या चांदीचे जडावकाम असलेल्या साड्या अन् बरंच काही....अशा अनेक भेटवस्तू देण्यात आल्या.

अनंत राधिकाचं लग्न केवळ अंबानी कुटुंबिय आणि नातेवाईकांपुरतेच मर्यादित नव्हते. या लग्नामुळे एका छताखाली जगभरातील अनेक कुटुंब एकत्र पाहायला मिळाली.

बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रांतील मान्यवरांची मैत्री, दोस्ती पाहायला मिळाली. विशेष म्हणजे नीता अंबानी प्रत्येक सोहळ्यात बोलताना, 'माझं कुटुंब' असं म्हणत होत्या. त्यातून त्यांच्या स्वभावातील प्रेमळ बाजू दिसत होती. तसेच इतकी संपत्ती असूनही पाय जमिनीवर टिकवून ठेवण्याचा त्यांचा मोठेपणा जगापुढे एक वेगळाच आदर्श ठेवत होता.

या लग्नसोहळ्यातील काही खास गोष्टी पाहु, ज्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय नेत्यांची लक्षवेधी उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर प्रमुख राजकीय नेत्यांनी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित करण्यात आलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थित राहून नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यावर अनंत आणि राधिका यांनी भारतीय परंपरेप्रमाणे वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतला. मोदींनी उभयतांना आशीर्वाद दिले. तसेच पंतप्रधानांनी राधिकाच्या कुटुंबीयांचीसुद्धा भेट घेतली.

दिग्गज नेत्यांची हजेरी

या सोहळ्यात ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव आणि शरद पवार यांच्यासह विविध पक्ष आणि विचारधारा यांच्यातील एकता आणि सद्भावना पाहायला मिळाली.

धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजलं. लग्नामध्ये संगीत, पूजा, मेहंदी आणि हळदी यांसारख्या पारंपारिक समारंभांचा समावेश होता. भारतीय वारसा आणि परंपरेविषयी अनंत आणि राधिका यांना असलेला आदरच त्यातून दिसतो. एकूणच अंबानी कुटुंबातील अध्यात्मिक परंपरा आणि संस्कृतीविषयक आस्था शिवशक्ती पूजेतून दिसली.

जगद्गुरू रामभद्राचार्य, स्वामी सदानंद सरस्वती, स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांसारख्या धार्मिक नेत्यांनी या जोडप्याला आशीर्वाद दिले आणि धर्माच्या शिकवणींनी समारंभ समृद्ध केला. राधिका आणि अनंत अंबानी यांच्या विवाहाने साऱ्या जगालाच भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले.

रोजगारनिर्मिती

या लग्नाच्या खर्चामुळे वस्तू आणि सेवांच्या मागणीत मोठी वाढ झाली. ज्यामुळे उत्पादन वाढले. उत्पादन वाढल्यामुळे रोजगार निर्मिती आणि लघु-उद्योगांना आधार मिळाला. नीता अंबानी यांनी बनारसमध्ये प्रत्यक्ष जाऊन साड्या खरेदी केल्या. तिथल्या प्रसिद्ध चाट खाऊन पाहिले. ते त्यांना आवडलेही. पण इतक्यावरच त्या थांबल्या नाहीतर सदर चाटवाल्याला त्यांनी सोहळ्यात विशेष निमंत्रण दिलं. त्यामुळे छोट्या व्यवसायालादेखील मोठा हातभार लागला.

प्री वेडिंगदेखील कामगारवर्गासाठी फायद्याचा ठरले. जामनगरमध्ये झालेल्या प्री वेडिंगमुळं स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, वाहतूक सेवा आणि स्थानिक किरकोळ विक्रेत्यांसाठी महसूल आणि रोजगार वाढला.

'मेक इन इंडिया' उपक्रमाशी जोडून करून भारतात लग्नाचे आयोजन करणे, इतर प्रमुख कुटुंबांना त्यांचे उत्सव देशातच आयोजित करण्यासाठी प्रेरित करणे, अशा प्रकारे स्थानिक व्यवसायांना समर्थन मिळालं.

सामूहिक विवाह सोहळ्यामुळे समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला गेला. अंबानी कुटुंबाने वंचित लोकांसाठी सामूहिक विवाह आयोजित केला होता. यावेळी त्यांनी नवविवाहित जोडप्यांना कपडे आणि सोनेनाणे आदी भेटवस्तू दिल्या आणि भारतभर अशा शेकडो विवाहांना पाठिंबा देण्याचे वचन दिले.

इतकेच नव्हे तर अनंत अंबानी यांनी 40 दिवसांचा भंडारा आयोजित केला होता. यामध्ये दररोज हजारो लोकांना भोजन दिले जात होते. यातून परोपकार आणि समाजसेवेसाठी असलेली कुटुंबाची बांधिलकी दिसली. अनेक गोर-गरिबांचे आशीर्वादही अंबानी कुटुंबाला मिळाले.

लग्नाला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची उपस्थिती दिसली, ज्यामुळे कार्यक्रमाचे ग्लॅमर आणि मीडिया कव्हरेज वाढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com