Loksabha Election Result : एकनाथ शिंदेंनी पेलले ‘शिव’धनुष्य

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे बुरूज कधीच ढासळणार नाहीत. किल्ले अद्यापही शाबूत आहेत, असे लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील निकालावरून म्हणावे लागेल.
Loksabha Election Result
Loksabha Election Resultsakal
Updated on

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे बुरूज कधीच ढासळणार नाहीत. किल्ले अद्यापही शाबूत आहेत, असे लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील निकालावरून म्हणावे लागेल. राजकारणात ‘जर तर’ला महत्त्व नसते, तरीही असे म्हणावे लागेल, की जर शिवसेना फुटली नसती, तर भाजपच्या जागांचा आकडा दहाच्या आत आला असता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा विचार केला तर राज्यातील लोक आजही शिवसेनेला मानतात, हे स्पष्टच दिसून येते.

राज्यातील राजकीय समीकरणे २०१९ पासून बदलत गेली. शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. मतदारांनी त्यांना बहुमताचा कौलही दिला. मात्र, भाजपवर नाराज असलेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्ता ताब्यात घेतली. मुख्यमंत्री बनले. पुढे शिवसेनेला खिंडार पाडून भाजपने आघाडी सरकारला खाली खेचले.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने डाव टाकला. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार आणि खासदार फुटले. ते शिंदे यांच्या बाजूने गेले. शिवसेना खिळखिळी झाली होती. भाजप मागे असल्याने ठाकरे यांना लक्ष्य करण्यात शिंदेंना यशही आले.

एक गोष्ट येथे महत्त्वाची आहे ती म्हणजे बाळासाहेबांनी उभा केलेल्या पक्षाची ताकद तशीच राहावी, याची शिंदे यांनी काळजी घेतली. निवडणूक कोणतीही असो त्यांनी स्वतः त्यात लक्ष घातले. पक्ष फुटीनंतर खरी परीक्षा होती ती लोकसभेची. मुंबई उत्तर पश्‍चिम, ठाणे, कल्याण, संभाजीनगर, बुलडाणा, मावळ, हातकलंगले हे शिवसेनेचे बालेकिल्ले त्यांनी राखले. अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यात अटतटीची लढत झाली. त्यामध्ये अवघ्या ४८ मतांनी वायकर निवडून आले. काही असो मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरसह सात महत्त्वाच्या जागांवर शिवसेनेचा जो विजय झाला त्याचे श्रेय अर्थात शिंदे यांना द्यावेच लागेल.

वरचढ कामगिरी

हे सगळे खरे असले तरी उद्धव ठाकरे यांना शिंदे यांनी लक्ष्य केले. शिवसेना हा मूळ पक्ष, धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडे होते. ठाकरेंच्या पक्षापेक्षा यांच्याकडे आमदार आणि खासदार अधिक आहेत. भाजप, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर असतानाही त्यांना पूर्वीचे १८ हे संख्याबळ राखता आले नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा शिंदे यांनी एकतरी जागा अधिक जिंकून दाखवला हवी होती. तसे मात्र झाले नाही. तरीही महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि अजित पवार यांच्या पक्षापेक्षा उत्तम कामगिरी केली. आपल्या पक्षाचे धनुष्य त्यांनी पेलले आहे असा अर्थ आज काढावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.