मराठवाड्याच्या मातीने यंदा महायुतीला नाकारले. गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीची सरशी होती. छत्रपती संभाजीनगरमधील ‘एमआयएम’ची एक जागा वगळता सर्व सातही जागा युतीने राखल्या होत्या. यावेळी त्याउलट स्थिती आहे. संभाजीनगर सोडले तर बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि जालना या उर्वरित सात जागा महाविकास आघाडीने खेचून नेल्या आहेत.
विशेष असे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच मतदारसंघांत सभा झाल्या. त्यातील लातूर, नांदेड, धाराशीव, परभणीमधील महायुतीचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपच्या विरोधात प्रचंड रोष यावेळी दिसून आला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानेही निवडणुकीची हवा फिरवून टाकली. मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार, समान नागरी कायदा लागू करणार, असा प्रचार काँग्रेसने केला.
त्यातून दलित आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण आपल्या बाजूने फिरवण्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडी यशस्वी झाली. निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाडा धुमसत होता. या प्रश्नी तोकडा काढण्याची तत्परता युती सरकारने दाखवली नाही, अशी या समाजाची भावना आहे. त्याचा परिणाम म्हणून या समाजाने त्यांची ताकद निवडणुकीतून दाखवून दिली. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला.
मराठा आरक्षणाबरोबरच महागाई, पाणीटंचाई, विकासाचा अनुशेष या मुद्द्यांनीदेखील गणिते बदलून टाकली. या प्रदेशामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भक्कम उभी केली, ग्रामीण भागापर्यंत ती पोचवली. ती मुळे अजूनही घट्ट रुजलेली आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षात पाडलेली फूट मतदारांना रुचली नाही. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची शकलं झाली. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे घर भाजपने फोडले, असा समज सर्वदूर पसरला. त्याचा फटकाही भाजपला बसला. बीडमध्ये मराठा आणि वंजारी असा वाद झाला.
या बिघडलेल्या जातीय समीकरणामुळे तेथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीचा सामना रंगला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’चे इम्तियाज जलिल हे विद्यमान खासदार होते. परंतु मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरला आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे विजयी झाले. एकूणच भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.
नांदेडमध्ये काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांना निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पक्षात घेतले.येथील मतदार हा पारंपरिक काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. अचानक आपल्या नेत्याने पक्ष सोडून भाजपची वाट धरली, हे मतदारांना आवडले नाही. काँग्रेसने त्याचा प्रचारासाठी उपयोग करून घेतला. त्याचा फटका भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांना बसला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.