Loksabha Election Result : विजयी उमेदवारांच्या पारड्यात ५०.५८ टक्के मते; मागील खेपेच्या तुलनेत दोन टक्क्यांची घसरण

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या.
Voting
Votingsakal
Updated on

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. मागील निवडणुकीचा विचार केला असता यंदा बहुतांश उमेदवार हे सरासरी ५०.५८ टक्के एवढी मते घेऊन विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वच विजयी उमेदवारांची सरासरी मते ही २ टक्क्यांनी कमी झाल्याचे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संघटनेने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

ज्या उमेदवारांनी निवडणूक लढविण्याआधी स्वतःवर दाखल गुन्ह्यांची माहिती दिली होती त्यापैकी ४५ टक्के उमेदवारांना ५० टक्के आणि त्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. ‘एडीआर’ आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ (एनईडब्लू) यांनी यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीचे सविस्तर विश्लेषण जारी केले आहे. देशातील ५४३ पैकी ५४२ मतदारसंघांत त्यासाठी पाहणी करण्यात आली होती.

गुजरातच्या सुरतमधील भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने हा मतदारसंघ वगळण्यात आला होता. यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांनी सरासरी ५०.५८ टक्के मते मिळविली असून २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीतील मतांची सरासरी संख्या ही ५२.६५ टक्के एवढी होती.

विशेष म्हणजे २७९ विजयी उमेदवारांनी (५१ टक्के) उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांची संख्या लक्षात घेता अर्ध्यापेक्षा अधिक मते मिळविली तर २६३ (४९ टक्के) विजयी उमेदवार अर्ध्यावरच अडकले.

भाजपच्या ७५ उमेदवारांची मते घटली

भाजपच्या २३९ विजयी उमेदवारांपैकी ७५ (३१ टक्के) उमेदवारांना ५० टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली असून काँग्रेसमध्ये ९९ पैकी ५७ (५८ टक्के) उमेदवार हे पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी मते घेऊन विजयी झाले आहेत. प्रादेशिक पक्षांचा विचार केला असता समाजवादी पक्षाचे ३७ पैकी ३२, तृणमूल काँग्रेसचे २९ पैकी २१ आणि ‘द्रमुक’चे २२ पैकी १४ उमेदवार हे पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी मते घेऊन विजयी झाले आहेत.

बाहुबलींच्या पाठीशी मतांची पॉवर

यंदा निवडणूक लढविणाऱ्या २५१ विजयी उमेदवारांनी त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. त्यापैकी १०६ उमेदवारांनी ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मते मिळविल्याचे उघड झाले. ३९ पैकी १७ कोट्यधीश नसलेल्या उमेदवारांनाही इथपर्यंत मजल मारता आली.

आधीच्या निवडणुकीत विजयी उमेदवार हे ३५.४६ टक्के एवढ्या मतदारांचे प्रतिनिधित्व करत असत ते प्रमाण हे यंदा ३३.४४ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाच उमेदवार हे दोन हजारांपेक्षाही कमी मतांनी निवडून आले असून अन्य पाच उमेदवार हे ५० टक्क्यांपेक्षाही अधिक मते मिळवून विजयाचे मानकरी झाले होते.

‘नोटा’ला प्रतिसाद कमीच

पुन्हा विजयी झालेल्या २१४ उमेदवारांपैकी १०१ उमेदवारांना ५० टक्क्यांपेक्षाही अधिक मते मिळाली तसेच पुन्हा निवडून आलेल्या ९२ विजयी उमेदवारांचा विजयाचा फरक हा दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ‘नोटा’ला ०.९९ टक्के मते मिळाली असून हे प्रमाण २०१९ मध्ये १.०६ टक्के आणि २०१४ मध्ये १.१२ टक्के एवढे होते.

‘नोटा’ला मिळालेल्या मतांमध्ये क्रमशः घसरण होत गेल्याचे दिसून येते. एकूण मतदान हे २०२४ मध्ये ६६.१२ टक्के एवढे झाले होते २०१९ मध्ये हेच प्रमाण ६७.३५ टक्के एवढे होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.