Narendra Modi : ‘विकसित भारत’ देईन; शिवाजी पार्कवरून पंतप्रधान मोदींचे आश्‍वास

‘‘मुंबईत विक्रमी गुंतवणूक येते आहे. थोड्याच दिवसांत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला असेल. ही मोदींची गॅरंटी आहे. तुमच्या मुलांसाठी प्रगतीचा विश्वास देणारा विकसित भारत मी सोपविणार आहे,
Narendra Modi
Narendra Modisakal
Updated on

मुंबई : ‘‘मुंबईत विक्रमी गुंतवणूक येते आहे. थोड्याच दिवसांत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला असेल. ही मोदींची गॅरंटी आहे. तुमच्या मुलांसाठी प्रगतीचा विश्वास देणारा विकसित भारत मी सोपविणार आहे,’’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील महायुतीच्या सभेमध्ये बोलताना दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होती.

‘एकेकाळी मुंबई दहशतवादी हल्ल्यांनी हादरायची, थरथरायची, तसे काही गेल्या दहा वर्षांत झाले का?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला. ‘‘गरिबीचा जप करत बसणारे हे लोक निराशाग्रस्त असतात. ते प्रगती होणे अशक्य मानतात.

मोदी मात्र अशक्याला शक्य करतो. तुमच्या मुलाचे भविष्य शांततामय आणि सुरक्षामय करण्यासाठी माझ्या साथीदारांवर आणि भाजपवर विश्वास व्यक्त करा. प्रचंड संख्येने मतदानाला बाहेर पडून कमळ निशाणीवर शिक्का मारा,’’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ‘‘येत्या २०४७ मधील भारतात २४ तास काम करणाऱ्या मुंबईचे महत्त्वाचे योगदान राहणार असून जनादेश चोरणाऱ्यांना नाकारून नवभारताच्या निर्मितीला हातभार लावा,’’

असे आवाहन मोदी यांनी केले. सर्व जुने रेकॉर्ड मोडत ४ जूनला नवा भारत उभा राहील. मुंबईकरांनीही विक्रमी संख्येने मतदान करत या इतिहासाचा भाग व्हावे, अशी हाक त्यांनी दिली. ‘‘ मुंबईला जगातले जे जे आधुनिक, ते ते सर्व देण्यासाठी मी येथे आलो आहे. लवकरच भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबईत धावेल,’’ असेही ते म्हणाले.

मुंबईतील कोणते प्रकल्प अडविण्यात आले याची यादीच मोदी यांनी दिली. काँग्रेसवर हल्ला चढविताना त्यांनी महात्मा गांधींच्या सूचनेनुसार स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन झाले असते तर देशाच्या प्रगतीची पाच दशके बरबाद झाली नसती असा टोला लगावला. ‘व्यवस्थांचे काँग्रेसीकरण’ असा शब्द वापरत त्यांनी स्वतंत्र भारताची सहाव्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था २०१४ मध्ये माझ्या हातात सूत्रे आली तेव्हा ११ व्या क्रमांकावर घसरली होती. तुम्ही या सेवकाला काम दिले तेव्हापासून दहा वर्षांत देश पाचव्या क्रमांकाची आर्थिक शक्ती झाला आहे,’’ असेही त्यांनी नमूद केले. युवकांसाठी प्रगतीच्या अमर्याद संधी भाजप सरकार घेऊन येत आहे. शहरी मध्यम आणि गरिबाला ‘इज ऑफ लिव्हिंग’चा मार्ग आम्ही दाखविला आहे, असे ते म्हणाले.

अजित पवारांची उपस्थिती

मागील दोन दिवसांपासून प्रचारातून गायब असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शिवाजी पार्कमधील सभेत सहभागी झाले होते. ‘‘गेल्या दहा वर्षांतील मोदींचे काम गौरवास्पद आहे, त्यांचे कणखर नेतृत्वच भारत देशाला पुढे घेऊन जाणार आहे,’’ असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.