PM Modi : ‘सीएए’ कोणीही हटवू शकत नाही; पंतप्रधानांची आझमगडच्या सभेत स्पष्टोक्ती,‘सप’च्या राजवटीत यूपीत गुंडगिरी

‘सीएए’ कायद्याच्या नावावर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसकडून अपप्रचार केला जात असून हा कायदा कायम राहणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
PM Modi
PM Modisakal
Updated on

आझमगड (उत्तर प्रदेश) : ‘सीएए’ कायद्याच्या नावावर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसकडून अपप्रचार केला जात असून हा कायदा कायम राहणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विशेष म्हणजे नागरिकत्व (सुधारणा) कायद्यानुसार दोनच दिवसांपूर्वी चौदा जणांना नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिल्यानंतर आझमगडच्या आजच्या सभेत मोदी यांनी तुम्हाला जे काय करायचे ते करा, सीएए कायदा हटवू शकत नाहीत, असे स्पष्ट केले. दरम्यान, जौनपूर येथेही उमेदवार कृपाशंकर सिंह आणि माछीलशर मतदारसंघाच्या उमेदवार बी.पी. सरोज यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

भाजपचे खासदार आणि उमेदवार दिनेशलाल यादव निरहुआ यांच्या प्रचारार्थ आझमगड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या लालगंजच्या उमेदवार नीलम सोनकर उपस्थित होत्या. मोदी म्हणाले, राज्यातील निर्वासितांना सीएए कायद्यानुसार नागरिकत्व देण्याचे काम सुरू झाले आहे. ही सर्व मंडळी हिंदू, शिख, जैन आणि बौद्ध आहेत. ते दीर्घकाळापासून निर्वासित म्हणून राहत होते आणि त्यांनी धर्माच्या नावावर झालेल्या फाळणीची वेदना सहन केलेली आहे.

PM Modi
Pune-Delhi Flight : पुणे-दिल्ली विमानाला टग ट्रॅक्टरची धडक..एअर इंडियाच्या विमानाला भगदाड

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून सीएएवरून खोटा प्रचार केला जात आहे. ते उत्तर प्रदेश आणि पर्यायाने देशाला हिंसाचाराच्या आगीत ढकलू इच्छित आहेत. ‘इंडिया’ आघाडी देशातून सीएएला हद्दपार करू इच्छित आहे, मात्र सीएए कायदा कोणीही हटवू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. शेकडो निर्वासितांना या कायद्यानुसार नागरिकत्व प्रदान केले जाईल, असे आश्‍वासन यावेळी दिले.

जम्मू काश्‍मीरचे कलम ३७० हटवून तेथे शांतता आणि सुव्यवस्था बहाल करण्यात आली असून जनतेला दहशतवादापासून मुक्तता मिळाली. पूर्वीच्या काळात काश्‍मीरमध्ये निवडणुकीत आंदोलने व्हायची. धमक्या मिळायच्या आणि घराबाहेर पडू दिले जात नव्हते. परंतु यावेळी श्रीनगरमध्ये विक्रमी मतदान नोंदले गेले. आझमगडचे नावही कुख्यात होते. देशात कोठेही बॉम्बस्फोट झाला की आझमगडचे नाव जोडले जायचे. मात्र गेल्या दहा वर्षांत आझमगडची प्रतिमा बदलली आहे. मागच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने आझमगडसाठी काहीच केले नव्हते, असे ते म्हणाले.

सूर्यघर योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेनुसार मोफत व्यवस्था मिळणार अाहे. आता आपल्या घराचे बिल शून्य येणार आहे. वीजेचा वापर करणारा देखील नायक ठरेल. केवळ निरहुआच नाही तर आपणही हीरो व्हा. आताच त्यासाठी नोंदणी करून ठेवा. यात सौर ऊर्जेच्या माध्यमांतून आपले घर प्रकाशमान करा. तसेच अधिक वीज झाल्यास ती वीज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खरेदी करतील आणि त्यापासून उत्पन्नही मिळेल.

मोदी म्हणाले...

  • ‘सप’च्या राजवटीत उत्तर प्रदेशने गुंडाराज अनुभवले. आदित्यनाथांनी माफियांविरुद्ध मोहीम राबविली.

  • माझ्या नसानसांत राष्ट्रवादाचा संकल्प भिनलेला आहे आणि या आधारावरच भारतात बदल घडवत आहे.

  • सीएएवरून ‘सप’ आणि काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. सीएए कायदा लागूच राहील.

  • ‘सप’-काँग्रेस हे दोन पक्ष असले तरी त्यांचे एकच दुकान आहे. धादांत खोटे बोलण्याचे दुकान उघडले आहे.

  • मागास, दलित आणि आदिवासींवर अन्याय करत विरोधकांनी त्यांचा मतपेढीसाठी वापर केला.

  • विरोधकांनी राम मंदिराला देखील सोडले नाही. यावरही ते आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत.

  • ‘सब का साथ, सब का विकास’प्रमाणे सर्वांची सेवा केली जात आहे. देशाच्या आरोग्याची चिंता मोदी करत आहे. लोकांना उपचाराची हमी मोदी देत आहे.

यूपीत टीएमसी पॉलिटिक्स आणण्याचा घाट: मोदी

भदोही : काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी फिल्डिंग लावली जात असून राज्यात ते तृणमूल ब्रँड रुजवू इच्छित आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला. तृणमूलचे राजकारण म्हणजे हिंदुंची हत्या, दलित आणि आदिवासींचा मानसिक छळ, महिलांवरील अत्याचार करणे होय. पश्‍चिम बंगालमध्ये असंख्य भाजप नेत्यांची हत्या झाली आहे आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार उघडपणे हिंदूंना धमक्या देत गंगा नदीत बुडवून ठार करू, असे म्हणत आहेत. भदोही मतदारसंघात विरोधकांना अनामत रक्कम वाचविणे कठीण आहे. तृणमूल राजकारणाचा प्रयोग उत्तर प्रदेशात करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.