Mumbai : मुंबईत सहा तासांत ३०० मिमी;रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका,कोकणालाही झोडपले

मुंबईसह कोकणच्या काही भागांना सोमवारी वरुणराजाने अक्षरश: झोडपून काढले. रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने रेल्वे सेवा ठप्प झाली होती तसेच रस्ते वाहतूकही विस्कळित झाली.
Mumbai
Mumbai sakal
Updated on

मुंबई : मुंबईसह कोकणच्या काही भागांना सोमवारी वरुणराजाने अक्षरश: झोडपून काढले. रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने रेल्वे सेवा ठप्प झाली होती तसेच रस्ते वाहतूकही विस्कळित झाली. राजधानीत अनेक भागांमध्ये सहा तासांत ३०० मिलिमीटर पाऊस कोसळला. वेधशाळेने आणखी पावसाचा इशारा दिल्याने सोमवारी (ता.८) प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. सखल भागात पाणी साचल्याने मुंबई जलमय झाली होती. कोकणामध्येही जोरदार पाऊस कोसळू लागला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली असून पंचगंगेची जलपातळी स्थिर आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू लागला असून जगबुडी, अर्जुना, काजळी नद्या इशारा पातळीवर वाहू लागल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. सिंधुदुर्गात मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाडा, विदर्भाला आणि उत्तर महाराष्ट्राला मात्र अद्याप जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. मुंबईतील अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागात जात परिस्थितीचा आढावा घेतला तसेच यंत्रणांना सावध राहण्याचे आदेश दिले.

संपूर्ण जून आणि जुलै महिन्याचा पहिला आठवडा कोरडाच गेल्यामुळे मुंबईकरांना जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. रविवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत सहा तासांत ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सोमवारी सकाळी प्रवाशांची दाणादाण उडाली. मिलन सबवे, द्रुतगती मार्गावर पाणी साचल्याने बेस्ट वाहतूक इतर मार्गावरून वळविण्यात आली. हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून येत्या २४ तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. सायन, कुर्ला, चुनाभट्टी येथे रेल्वे रुळावर पाणी आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीला फटका बसला.

समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त

सोमवारी दुपारी १.५७ वाजण्याच्या दरम्यान समुद्रात ४.४० मीटर उंचीची भरती आली होती. याचवेळी मुसळधार पाऊस कोसळला असता तर शहरात पाणी भरण्याची शक्यता होती. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला केला होता. गेटवे ऑफ इंडिया येथे आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समुद्रापासून लांब केले .

सखल भाग जलमय

दादर टीटी, लालबाग, परळ, भायखळा, वडाळा, चेंबूर, सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी, घाटकोपर, कुर्ला, कांजूर, मुलुंड, भांडूप, वांद्रे, अंधेरी, पवई, कांदिवली, गोरेगाव, मालाड, मानखुर्द, वाशीनाका, फोर्ट, ग्रँट रोड आदी ठिकाणी पाणी साचले होते.

एरव्ही मुंबईत ६५ मिलिमीटर पाऊस झाला की अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. मात्र रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रेल्वे मार्ग, चुनाभट्टी, सायन याभागांत पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महापालिकेने पंप बसविले आहेत. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणांना चोवीस तास सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पन्नासहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. पावसामुळे सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक विस्कळित झाली. यामुळे २७ उड्डाणे वळवण्यात आली आणि पन्नासहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे रविवारी (ता. ७) मध्यरात्री २.२२ ते पहाटे ३.४० पर्यंत धावपट्टीचे कामकाज स्थगित करावे लागले. वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर विमानतळ प्रशासनाने येणाऱ्या विमानांना प्राधान्य दिले. ‘सीएसएमआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘‘पावसामुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे काही उड्डाणे वळविण्यात आली आहेत. हवामानाच्या घटनेमुळे होणारे अतिरिक्त वेळापत्रक बदलण्यासाठी काम सुरू आहे. प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या अगोदर त्यांच्या विमान कंपन्यांशी थेट त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासावी.’’ यामध्ये इंडिगो कंपनीची उड्डाणे सर्वात जास्त प्रभावित झाली. यामध्ये येणारी २२ आणि जाणारी २० विमाने रद्द करण्यात आली, तर स्पाइस जेटची येणारी आणि जाणारी प्रत्येकी तीन उड्डाणे रद्द करण्यात झाली.

मायानगरी पाण्यात

  • मिलन सबवे, द्रुतगती मार्गावर पाणी साचले

  • हवामान विभागाकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’

  • सायन, कुर्ला, चुनाभट्टी येथे रेल्वे रुळावर पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.