निवडणुकीसाठी 5 हजारांवर पोलिस, 2 हजार होमगार्ड सज्ज! पोलिस पाटलांवरही विशेष जबाबदारी; ‘एक्साईज’कडून हॉटेल, ढाब्यांवरील पार्ट्या, मद्यपानावरही लक्ष

विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी या हेतूने यंदा शहर व ग्रामीणमध्ये पाच हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय दोन हजार होमगार्ड व बाहेरूनही काही बंदोबस्त मागविण्यात येणार आहे. विधानसभेसाठी जिल्ह्यात ३७२३ मतदान केंद्रे असून त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
police
police esakal
Updated on

सोलापूर : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी या हेतूने यंदा शहर व ग्रामीणमध्ये पाच हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय दोन हजार होमगार्ड व बाहेरूनही काही बंदोबस्त मागविण्यात येणार आहे. विधानसभेसाठी जिल्ह्यात तीन हजार ७२३ मतदान केंद्रे असून त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर नाकाबंदी लावली आहे. २४ तास त्याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा खडा पहारा आहे. निवडणूक काळात परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात दारूची अवैध वाहतूक होणार नाही, याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. याशिवाय त्यांची १० भरारी पथके देखील अवैधरित्या दारुची वाहतूक व विक्रीवर लक्ष ठेवून असणार आहेत.

ढाब्यांवर दारू विक्री व मद्यपान करता येणार नाही. कायद्याचे उल्लंघन केल्यास हॉटेल किंवा ढाबा मालकासह तेथील मद्यपींना अटक होऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच ग्रामीण पोलिस देखील जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी लावणार आहेत. त्याठिकाणी प्रत्येक वाहनांची तपासणी व नोंद केली जाणार आहे. निवडणुकीसाठी पैसा किंवा अन्य वस्तूंची अवैधरित्या वाहतूक होणार नाही, याची खबरदारी ते घेतील. तसेच महसूल अधिकाऱ्यांची भरारी पथके देखील असणार आहेत.

पोलिस परवानगीशिवाय सभा, मिरवणुकीवर निर्बंध

निवडणुकीच्या आचारसंहिता काळात कोणत्याही राजकीय पक्षांना सभा, मिरवणुका विनापरवाना घेता येत नाहीत. त्यासाठी पोलिसांकडून किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक आहे. सध्या आदर्श आचारसंहिता सुरू असून उमेदवारी अर्ज भरायला सुरवात होऊन उमेदवारांची यादी अंतिम झाल्यावर हा नियम सर्वांना काटेकोरपणे पाळावाच लागतो. अन्यथा आचारसंहिता भंगप्रकरणी कठोर कारवाई होऊ शकते.

विधानसभेची निवडणूक संपेपर्यंत नाकाबंदी

जिल्ह्यातील नांदणी, वागदरी व मरवडे या तीन ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. संशयित वाहनांची तपासणी त्याठिकाणी केली जात असून तेथे २४ तास अधिकारी, कर्मचारी तैनात असतील. अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री अशा बाबींवर त्याठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. विधानसभेची निवडणूक संपेपर्यंत ही नाकाबंदी राहील.

- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

पोलिस पाटलांवर गावांची जबाबदारी

जिल्ह्यातील पोलिस पाटलांनी निवडणुकीच्या काळात गावात भांडणे होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायची आहे. गावातील वातावरणाची माहिती त्यांनी वेळोवेळी पोलिसांना द्यावी. जिल्ह्यात ६००हून अधिक पोलिस पाटील आहेत. गावातील अवैध धंदे, प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगारांचा वावर, शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची माहिती त्यांनी पोलिसांना देणे अपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना त्यादृष्टीने सूचना केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.