20 महिन्यांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 504 गुन्हे! सोलापूर शहर- जिल्ह्यातील स्थिती; अपहरण झालेल्या 85 अल्पवयीन मुलींचा शोध लागेना

१ जानेवारी २०२३ ते २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातील तब्बल ५०४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. पोलिसांकडील माहितीनुसार अपहरण झालेल्यांपैकी ३१६ मुलींचा शोध पोलिसांनी घेतला, पण अद्याप ८५ अल्पवयीन मुलींचा शोध लागलेला नाही.
solapur
Missing Girl esakal
Updated on

सोलापूर : अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व विनयभंगाच्या घटना समोर येत असतानाच दुसरीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हेही लक्षणीय असल्याची वस्तुस्थिती आहे. १ जानेवारी २०२३ ते २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातील तब्बल ५०४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. पोलिसांकडील माहितीनुसार अपहरण झालेल्यांपैकी ३१६ मुलींचा शोध पोलिसांनी घेतला, पण अद्याप ८५ अल्पवयीन मुलींचा शोध लागलेला नाही.

बालविवाह प्रतिबंधक कायदा करूनही सोलापूर जिल्ह्यातील बालविवाह पूर्णत: बंद आहेत, अशी स्थिती नाही. मागील आठ महिन्यात ८४हून अधिक बालविवाह रोखले गेले आहेत. दुसरीकडे हुंडा प्रतिबंधक कायदा असूनही हुंडा, विवाहातील मानपान, माहेरून पैसे आण, अशा प्रमुख कारणांसाठी लाडक्या बहिणींचा छळ सुरूच आहे.

राज्य शासनाने सध्या मुलींना उच्चशिक्षण मोफत केले, तरीदेखील बालवयात विवाह करण्याचीच पालकांची मानसिकता आहे. पालकांकडून मनाविरुद्ध विवाहासाठी तगादा, शिक्षण सोडून मजुरीचा आग्रह, सामाजिक वातावरण, मोबाइलचा अतिवापर, समोरच्याकडून प्रेमाचे किंवा विवाहाचे आमिष, अशा प्रमुख कारणांमुळे अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांत अपहरण म्हणून गुन्हा नोंद होतो. २०२३ मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांत १९९ तर चालू वर्षात १५७ गुन्हे दाखल आहेत. सोलापूर शहरात गतवर्षी सव्वाशे तर चालू वर्षात ६२ गुन्ह्यांची नोंद आहे. बेपत्ता मुलींच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून पालकांचेही पोलिसांत हेलपाटे सुरू आहेत.

२० महिन्यांची जिल्ह्यातील स्थिती

  • (सोलापूर शहर)

  • अल्पवयीन मुली बेपत्ता

  • १८३

  • सापडलेल्या मुली

  • १३८

  • न सापडलेल्या मुली

  • ४५

--------------

सोलापूर ग्रामीण

  • अल्पवयीन मुली बेपत्ता

  • ३५६

  • सापडलेल्या मुली

  • ३१६

  • न सापडलेल्या मुली

  • ४०

वेश्या व्यवसायात परराज्यातील मुली

सोलापूर ग्रामीणमधील स्थानिक पोलिसांबरोबरच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुंटणखान्यांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. १ जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत बार्शी शहर- ग्रामीण, कुर्डुवाडी, अकलूज, पंढरपूर शहर- ग्रामीण, मंगळवेढा, टेंभुर्णी अशा ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईतून ५५ ते ६० मुली- महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. त्यात सर्वाधिक तरुणी पश्चिम बंगाल, गुजरात, कोलकत्ता येथील असून काहीजणी स्थानिक व मुंबईतील असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईत निश्चितपणे वाढ झाली, पण हे रॅकेट कोठून कसे चालते याच्या मुळापर्यंत पोलिसांना अद्याप पोचता आलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.