NCP Crisis : अजित पवार यांच्यासह ८ आमदांरानी शिवसेना-भाजपला समर्थन देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली. त्यानंतर आता पक्षावर दावा सांगत अजित पवार थेट मैदानात उतरलेत आहेत. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या याचिकेवर कारवाई करताना शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाला आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी नोटीस दिली आहे . या नोटीसीनंतर अजित पवारांनी आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी आपल्या गटातील सर्वच आमदार व जिल्हाध्यक्षांना संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे अधिकाधिक प्रतिज्ञापत्र गोळा करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांनी 10 हजार आणि जिल्हाध्यक्षांना 5 हजार शपथपत्र भरून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं असल्याची माहिती समेर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर अजित पवार गटाकडून कागदपत्रांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
अद्याप निवडणूक आयोगाने अजित पवार व शरद पवार गटाला अद्याप प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. पण तरीदेखील अजित पवारांनी आतापासूनच प्रतिज्ञापत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केल्याचे दिसुन येत आहे.
अजित पवारांची प्रतिक्रीया
शपथपत्रांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांच्या बाजूने ते प्रयत्न करतील, आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करू. राजकारण आणि कुटुंब दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पवार साहेबांना महाराष्ट्रातले नागरिक त्यांना कुटुंब समजतात. महाराष्ट्रासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे.
शरद पवारही मैदानात
अजित पवारांच्या बंडानंतर BJP ला शह देण्यासाठी शरद पवारांनी 3 मास्टरप्लॅन तयार केले आहेत.
पहिला प्लॅन आहे पक्षविस्तार
राज्यातल्या महत्वाच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात सभा घेऊन पक्ष बांधणी करणार. राष्ट्रवादीची ताकद ज्या जिल्ह्यात आहे तिथे स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून मोर्चेबांधणी करणार.
यातली पहिली सभा ही येवला येथे झाली. या सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. तेव्हा जास्तीत जास्त जिल्ह्यात हाच प्रयोग शरद पवार करतील असा होरा आहे.
दुसरा प्लॅन आहे तो पर्यायी नेतृत्व तयार करण्याचा
शरद पवारांनी जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार फुटले आहेत तिथे तिथे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना ताकद देण्याचे काम सुरु केले आहे.
उदाहरण घ्यायचेचे झालं तर पारनेरमध्ये नीलेश लंकेंविरोधात झावरेंना तर नगरमध्ये संग्राम जगताप यांच्या विरोधात अभिषेक कळमकर यांना शरद पवारांनी पुन्हा जवळ केलं आहे. पक्षात नवी जबाबदारी दिली आहे. तेव्हा असे नेतृत्व तयार करुन त्यांना निवडणूकीत उतरवण्याचा पवारांचा बेत आहे.
तिसरा प्लॅन आहे तो भाजपला खिंडार पाडण्याचा
भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एक झाल्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या अनेक आजी माजी नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. जागावाटपामध्ये भाजपला अनेक ठिकाणी अॅडजस्ट करावे लागणार आहे.
तेव्हा या नाराज आणि अस्वस्थ भाजप नेत्यांना स्वत:च्या गोटात खेचण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या गटाकडून केला जात आहे. असं झालं तर पवार भविष्यात भाजपला नक्कीच हादरा देऊ शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.