यश वाडेकर
ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासोबतचं आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे बंडाच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात अभेद्य राहिलेल्या काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
मराठवाड्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंसारखे मात्तबर नेते असताना काँग्रेस पक्ष मराठवाड्यात अव्वल राहिला आहे. याचे कारण म्हणजे शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुखांचं नेतृत्व. शंकररावांनंतर त्यांचा वारसा अशोक चव्हाणांनी पुढे नेला.
एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जातं. आदर्श घोटाळ्याचे आरोप वगळता त्यांची राजकीय कारकीर्द ही उल्लेखनिय राहिलेली आहे. आमदारकी, खासदारकी तसेच महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणं, महाराष्ट्र काँग्रेससाठी अडचणीचं ठरणार आहे. पक्षात मानाचे स्थान असणाऱ्या अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्याची कारणे नेमकी काय आहेत? असा प्रश्न उपस्थित होतोय.
पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व
अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्या अनुभवाचे आणि सुसंस्कृत स्वभावाचे सगळेच गोडवे गातात. अशा अशोकरावांची राज्यातील नेतृत्वावर नाराजी असल्याची चर्चा होती. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडल्याची तक्रार त्यांनी केल्याचं सांगण्यात येतं. राज्याप्रमाणेच केंद्रातील नेतृत्वासमोर अनेकवेळा प्रश्न मांडूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने अशोक चव्हाण नाराज होते.
आदर्श घोटाळा
आदर्श घोटाळ्यात नाव आल्याने अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होतो. नुकत्याच झालेल्या संसदीय अधिवेशनात मोदींनी काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढल्याचं स्पष्ट केलं. त्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख असल्याने आगामी काळात पुन्हा चौकशीचा ससेमीरा मागे लागण्याच्या भीतीमुळे चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
पुन्हा मुख्यमंत्री होणे नाही
सध्या महाराष्ट्राची राजकीय परस्थिती पाहता मुख्यमंत्री पदासाठी मोठी रांग आहे. त्यामध्ये अशोक चव्हाणांचा नंबर लागणे अशक्य मानलं जातंय. हाताशी असणारा अनुभव आणि प्रसाशनाची उत्तम जाण, यामुळे अशोक चव्हाणांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. २०२४ ला भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्यास आपल्या अनुभावाला साजेस पद मिळण्याची आशा अशोक चव्हाणांना नक्कीच असणार.
वंचितची एन्ट्री जिव्हारी लागणारी
२०१४ मध्ये मोदी लाटेतही नांदेड लोकसभेतून अशोक चव्हाण विजयी झाले होते. पण २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीने मते घेतल्याने अशोक चव्हाणांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्या पराभवाची सल चव्हाणांच्या मनात असतानाच वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. प्रकाश आंबेडकरांसाठी महाविकास आघाडीचे दारं उघडी झाली. पण आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्यास अशोक चव्हाणांचा विरोध असल्याचं सांगण्यात येतंय.
मोदी-शाहांना अशोक चव्हाणांची गरज
सुषमा स्वराज, अरूण जेटली अशा बड्या नेत्यांच्या अकाली जाण्याने भाजपमधे अनुभवी आणि प्रशासनावर पकड असणाऱ्या नेत्यांची कमी नेहमी जाणवते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असणारा अनुभव, शांत, सुशिक्षत आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्वामुळे अशोक चव्हाणांची केंद्रातील नेत्यांना गरज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे मराठा नेता म्हणून ओळखले जाणारे अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांच्याकडे २०२४ मध्ये मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
एकूणच काँग्रेसला घटस्फोट देऊन भाजपशी घरोबा करणे अशोक चव्हाणांच्या राजकीय भविष्यासाठी सोयीचे असणार आहे. आता अशोक चव्हाणांसोबत किती आमदार येतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.