ग्रामीण पोलिसांचा मोठा निर्णय! महामार्गांवर आता दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती; कारवाईसाठी महामार्गांवर आता पथके; ब्लॅकस्पॉट, हॉटेल, ढाब्यांबाहेरही राहणार पोलिस

जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आता बेशिस्त दुचाकी, चारचाकी चालकांसह जड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुचाकीस्वारांकडे हेल्मेट जरुरी असून चारचाकी चालकाने सिटबेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे.
Two wheeler helmet
Two wheeler helmetSakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आता बेशिस्त दुचाकी, चारचाकी चालकांसह जड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुचाकीस्वारांकडे हेल्मेट जरुरी असून चारचाकी चालकाने सिटबेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेने सात तालुक्यांसाठी स्वतंत्र पथके तयार केली असून त्यांच्या माध्यमातून आता कारवाईला सुरवात केली जाणार आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ७० टक्के अपघात हे दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय रात्री दहानंतर हॉटेल, ढाब्यांवर मद्यपान केलेले मद्यपी वाहनचालक रस्त्यांवरून बिनधास्तपणे वाहने चालवितात, अशीही स्थिती आहे. त्यामुळे रात्री दहा ते १२ या वेळेत त्यांच्यावरही लक्ष ठेवून दंडात्मक कारवाई करण्याचे नियोजन वाहतूक पोलिसांनी केले आहे. याशिवाय अनफिट वाहने, परवाना नसताना वाहन चालविणे, अल्पवयीन वाहन चालक, ट्रिपलसीट दुचाकी, क्षमतेपेक्षा अधिक माल किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.

रस्ते अपघाताची कारणे व उपाययोजनांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय सप्रे यांच्या बैठकीनंतर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईचे ठोस नियोजन केले आहे. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आता ठोस कारवाई होणार

जिल्ह्यातील अपघातांची कारणे, अपघातप्रवण ठिकाणे, अपघाताच्या वेळा, मार्ग याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता अपघात होवू नयेत म्हणून त्या मार्गांवर, महामार्गांवरील हॉटेल, ढाबे, चौक अशा ठिकाणी बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांना हेल्मेट तर चारचाकी चालकांसह आतील प्रवाशांना सिटबेल्ट बंधनकारक असेल. वाहनाचे फिटनेसही आवश्यक असेल.

- बाळासाहेब भरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक), सोलापूर ग्रामीण

तीन टोल वाचतात म्हणून वाहनचालकांचा शॉर्टकट

करकंबवरून पंढरपूर- मंगळवेढामार्गे विजयपूरला जाण्यासाठी जड वाहने याच मार्गावरून ये-जा करतात. सोलापूरकडे येऊन केगावजवळील हत्तूर बायपासने जाण्याऐवजी वाहनचालक करकंबवरून शॉर्टकट घेतात. या मार्गावरून गेल्यास तीन टोल नाके वाचतात आणि ५० किलोमीटर अंतराची बचत होते. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठी असून सर्वाधिक अपघात याच रोडवर होत असल्याची बाब पोलिसांच्या अभ्यासातून समोर आले आहे.

ठळक बाबी...

  • सकाळी १२ ते रात्री १२ या वेळेतच होतात सर्वाधिक अपघात

  • वाहतूक पोलिसांनी कारवाईवेळी ड्रेसवरच असणे बंधनकारक, जॅकेट चालणार नाही

  • दुचाकीस्वारांना हेल्मेट तर चारचाकी चालकांना असणार सिटबेल्ट बंधनकारक

  • हॉटेल, ढाबे, चौक अशा ठिकाणी थांबून मद्यपींवर केली जाणार कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.