CM Eknath Shinde : पीक कर्जासाठी ‘सिबिल’ची सक्ती नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बँकांना आवाहन

महाराष्ट्राचे बलस्थान शेती असल्याने बँकांनी शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal

मुंबई - महाराष्ट्राचे बलस्थान शेती असल्याने बँकांनी शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये. त्याचबरोबर पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबिल स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३व्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती देताना त्यांनी, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. ‘राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे,’ असा निर्णय या बैठकीत घेण्यात असून समितीने सादर केलेल्या राज्याच्या सन २०२४-२५ साठीच्या ४१ लाख २८६ कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी ‘आरबीआय’ तसेच ‘नाबार्ड’कडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील तसेच राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अविरल जैन आदी उपस्थित होते.

‘‘शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. दुर्दैवाने निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांवर संकट येत असते, अशावेळी शासन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. त्यासाठी संकटातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांहून दुपटीने मदत केली आहे. मदतीची हेक्टरी मर्यादा सुद्धा वाढवली आहे एक रुपयात पीक विमा दिला आहे.

बँकांनी त्याला संकट काळात आर्थिक पाठबळ न दिल्यास त्याला अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागतो. यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू, त्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे,’ असे शिंदे यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री विखे-पाटील, सहकार मंत्री वळसे -पाटील, कृषी मंत्री मुंडे यांनीही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सहकारी बँकांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांना कर्ज देताना सहकार्य करण्याच्या मुद्यावर या मंत्र्यांनी यावेळी विविध सूचना केल्या.

पत आराखडा (आकडे कोटी रुपयांत)

  • ३३,९०,६०१ - सन २०२३-२४चे उद्दिष्ट

  • ३८,७०,३८२ - प्रत्यक्षातील वाटप

  • ४१,००,२८६ - २०२४-२५चे उद्दिष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com