नवी दिल्ली: सनातन धर्म रक्षणासाठी सनातन मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठविण्यात आले असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.
पुण्यात मुख्यालय असलेले ब्राह्मण महासंघ सनातन धर्माच्या रक्षणासाठी तसेच संवर्धनासाठी काम करीत असल्याचे सांगून डॉ. कुलकर्णी म्हणाले की, तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या प्रसादात जनावराची चरबी मिसळली जात असल्याचा प्रकार अलीकडेच काळात उघडकीस आला.
या प्रकारामुळे हिंदू समाजात संताप निर्माण झाला. हिंदू धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, याकरिता ब्राह्मण महासंघाकडून जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे. मंदिरातील प्रसाद बनविण्याच्या दृष्टीने दिशानिर्देश जारी केले जाणार आहेत. प्रसादात अखाद्य वस्तू मिसळणे संविधानातील धार्मिक स्वतंत्रतेच्या तरतुदी विरोधात आहे. असे प्रकार करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
मंदिर व्यवस्थापनासाठी ज्या समित्या स्थापन केल्या जातात, त्या समित्यांवरील सदस्य हिंदू असणे आवश्यक नाही, अशी तरतूद आहे. सरकारच्या अशा प्रकारच्या निर्णयामुळे हिंदू लोकांच्या भावनांना धक्का पोचवण्यास बळ मिळत आहे. मंदिरातील सर्व कामे धर्मशास्त्रांनुसार झाली पाहिजेत. या पार्श्वभूमीवर सनातन मंत्रालयाची स्थापना केली जावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.