राज्यातील ‘या’ ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळ! ट्रिगर-टू लागू; हेक्टरी ८,५०० हजार ते २२,५०० रुपयांपर्यंत मिळणार मदत, सरकारने दिले हे आदेश...

राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर-टू लागू करण्यात आला आहे. त्यात सोलापूर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधित सात तालुक्यांचा समावेश आहे.
sakal exclusive
sakal exclusiveSAKAL
Updated on

सोलापूर : पावसाळा सुरु असतानाही सरासरीच्या ४० टक्के सुद्धा पाऊस झाला नाही आणि त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, अशा राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर-टू लागू करण्यात आला आहे. त्यात सोलापूर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधित सात तालुक्यांचा समावेश आहे.

पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस तथा पावसाचा खूप दिवसांचा खंड, जमिनीतील पाणी पातळीत घट, पिकपेरा व अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट तथा संपूर्ण पिके वाया, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणाऱ्या स्रोताची सद्य:स्थिती, अशा सर्व बाबींचा विचार करून काही तालुक्यांमध्ये दुष्काळासंदर्भातील ट्रिगर-टू लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, खरीप- २०२३ हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन ‘महा- मदत’ प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे. ट्रिगर- टू लागू झालेल्या तालुक्यांमधील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजन केंद्र, नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या ‘महा- मदत’ ॲपचा वापर करावा लागणार आहे. त्यानुसार दुष्काळ कशा स्वरुपाचा आहे, याचा अहवाल तयार होईल. त्यानंतर दुष्काळाची अंतिम कार्यवाही होऊन बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर होईल. ही प्रक्रिया आता सुरु होणार असून त्याचा अहवाल ऑक्टोबरअखेरीस शासनाला सादर होईल आणि त्यानंतर राज्य सरकारकडून मदत जाहीर केली जाणार आहे.

शासनाला पाठविला जाणार अहवाल

केवळ दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे किती नुकसान किती झाले आहे, याचे क्षेत्रीय सर्व्हेक्षण केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील कोणतीही दहा गावे निवडून त्याठिकाणचे पंचनामे होतील. दुष्काळाचे स्वरूप मध्यम की तीव्र (गंभीर) स्वरुपाचे आहे, याचा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाकडून दुष्काळाची अंतिम कार्यवाही होणार आहे.

सरकारकडून मिळणारी दुष्काळी मदत

  • शेती प्रकार मदतीची रक्कम

  • जिरायत ८,५००

  • बागायती १७,०००

  • बहुवार्षिक २२,५००

‘या’ ४३ तालुक्यांची स्थिती चिंताजनक

उल्हासनगर (ठाणे), शिंदखेडा (धुळे), नंदुरबार (नंदुरबार), मालेगाव, सिन्नर, येवला (नाशिक), बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी-पौंड, पुरंदर-सासवड, शिरुर-घोडनदी व वेल्हे (पुणे), बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला (सोलापूर), अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना व मंठा (जालना), कडेगाव, खानापूर-विटा, मीरज, शिराळा (सांगली), खंडाळा व वाई (सातारा), हातकणंगले व गडहिंग्लज (कोल्हापूर), औरंगाबाद व सोयगाव (छत्रपती संभाजीनगर), आंबेजोगाई, धारुर व वडवणी (बीड), रेणापूर (लातूर), लोहारा, उस्मानाबाद व वाशी(धाराशिव), बुलढाणा व लोणार (बुलढाणा).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.