Raj Thackeray
Raj Thackeraysakal

Raj Thackeray : महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही,राज ठाकरे ; विधानसभेच्या २२५ जागा मनसे लढविणार असल्याचे स्पष्टीकरण

देशभरातच खासगीकरण होत असून खासगी संस्थांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्याठिकाणी आपल्या मुलांना आरक्षण मिळणार आहे का, किती ठिकाणी आरक्षण मिळेल, याचा अभ्यास करायला हवा.
Published on

सोलापूर : देशभरातच खासगीकरण होत असून खासगी संस्थांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्याठिकाणी आपल्या मुलांना आरक्षण मिळणार आहे का, किती ठिकाणी आरक्षण मिळेल, याचा अभ्यास करायला हवा. महाराष्ट्रात सर्वकाही मुबलक असल्याने इथे आरक्षणाची गरजच नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे.

ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी सोलापुरात आले होते. ते म्हणाले, ‘राज्यातील भुमिपुत्रांना सर्वच उद्योगांमध्ये १०० टक्के नोकऱ्या मिळाव्यात, चांगले शिक्षण मिळायला पाहिजे. खासगी संस्था व खासगीकरणामुळे आरक्षणाचा लाभ सर्वांनाच होईल का, याचा अभ्यास करणे जरूरी आहे. बाहेरील लोक याठिकाणी येवून शिक्षण, नोकऱ्या मिळवत आहेत. त्यामुळे आपल्या भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे. सध्या कोणाच्यातरी खांद्यावर बंदुक ठेवून जातीपातीचे राजकारण केले जात असून त्यातून कोणाचेच भले होणार नाही, समोरचे आपल्याला मुर्ख बनवत असल्याचे ओळखायला पाहिजे. जातीचे राजकारण शाळा, कॉलेजपर्यंत पोचत असून त्यातून कोणाचेही भले होणार नाही, सुस्ंकृत महाराष्ट्राला हे अपेक्षित नाही. माध्यमांनी अशा लोकांना दाखवायचे बंद केल्यास सगळे नीट होईल, असेही ते म्हणाले.

सगळे गुजरातलाच का?

देशातील मोठे स्टेडिअम बांधायचे आहे ते गुजरातलाच, ऑलिंपिक घ्यायचे ते गुजरातलाच आणि देशाच्या बजेटमधील सर्वाधिक हिस्सा उत्तरप्रदेश व गुजरातलाच, असे कशासाठी? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी सर्वच राज्यांना समान निधी, न्याय द्यावा. उद्या मराठी माणूस पंतप्रधान झाला आणि ते असे करीत असल्यास त्यांनाही आपण विरोधच करू. दरम्यान, मणिपूरच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मणिपूर व्हावे असा प्रयत्न करू नये’.

आता ‘लाडका मतदार’

राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडका ज्येष्ठ नागरिक अशा योजना आणल्या आहेत. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, ‘सर्वच घटकांना घरबसल्या सरकार देणार असेल तर आता केवळ लाडका मतदार योजना आणली तर सर्वांनाच बरे वाटेल’.

पक्षाचा दोनदा सर्व्हे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनदा सर्व्हे केला आहे. राज्यातील २२५ जागांवर मनसे लढेल, त्यादृष्टीने सध्या आढावा घेतला जात आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर सगळेच जमिनीवर आल्याने आता मार्चमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक महापालिका, कोणामुळे?

बाहेरील राज्यातून लोंढे आपल्याकडे येतात आणि त्यांच्या सोयीसाठी आपण विकासाच्या नावाखाली मोठा खर्च करतोय. उत्तरप्रदेश, बिहार अशा राज्यांमध्ये महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या जाहिराती येतात, पण आपल्या लोकांना माहितीसुद्धा नसते हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.