नागपूर: ऑनलाईनच्या जमान्यात तरूणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आज कोणीही फसवणूकीपासून सुटले नाही. मात्र, आता सायबर गुन्हेगारांची मजल थेट न्यायीक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. न्यायासाठी ज्या न्यायमूर्तींकडे पीडित दाद मागतात, आता त्याच न्यायमूर्तींच्या नावावर लोकांची फसवणूक करण्याचा कारभार सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. याबाबत स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस प्रसिद्ध करीत नागरिकांना सावध राहण्याची सूचना केली आहे.