मोठी बातमी! ‘SEBC’ सवलतीसाठी नव्याने करावा लागणार अर्ज; संभ्रमातील प्रशासन मागविणार मार्गदर्शन; ऐन प्रवेशाच्या मुहुर्तावरील बदलामुळे विद्यार्थी चिंतेत

२८ जूनला शासनाने शुद्धीपत्रक काढून पूर्वीचा १५ मार्चचा आदेश रद्द केल्याने पूर्वी काढलेले ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र आता चालतील का? आणि दुसरीकडे २८ जूनपूर्वी प्रांताधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जांचे काय?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
sakal exclusive
sakal exclusivesakal
Updated on

सोलापूर : मराठा समाजातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी ‘एसईबीसी’तून १० टक्के आरक्षण मिळाले. त्यानंतर १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार हजारो तरुण-तरुणींनी नोकरी किंवा शैक्षणिक कामकाजासाठी ‘एसईबीसी’ प्रमाणपत्रे काढली. पण, २८ जूनला शासनाने शुद्धीपत्रक काढून पूर्वीचा १५ मार्चचा आदेश रद्द केल्याने पूर्वी काढलेले ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र आता चालतील का? आणि दुसरीकडे २८ जूनपूर्वी प्रांताधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जांचे काय?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह अन्य विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आता जेईई, सीईटीच्या निकालानंतर अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांचे देखील प्रवेश सुरू होतील. तर आयटीआय, शासकीय व खासगी तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासोबत २८ जूनपूर्वी काढलेले एसईबीसी प्रमाणपत्र जोडले आहे तर काहींनी त्याची पोच पावती जोडली आहे. मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या शुद्धीपत्रकानुसार नॉन क्रिमीलेअर व एसईबीसी प्रमाणपत्र स्वतंत्र करण्यात आले आहे. पूर्वी उत्पन्नाचा दाखला एक की तीन वर्षाचा आहे, त्यावरून तेवढ्या वर्षाचे एसईबीसी व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र एकत्रित (एका खाली एक जोडूनच) मिळत होते. शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार पूर्वी काढलेले दाखले प्रवेश किंवा अन्य कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत का, शुद्धीपत्रक निघण्यापूर्वी अर्ज केलेल्यांना पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार नाही ना, या प्रश्नांची उत्तरे सद्य:स्थितीत जिल्हा प्रशासनाकडे सुद्धा नाहीत.

अभियांत्रिकी प्रवेशाला बुधवारपासून प्रारंभ?

‘सीईटी’चा निकाल जाहीर होऊन २२ दिवस झाले तरीदेखील अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झालेले नाहीत. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कागदपत्रे अपलोड, त्याची छाननी हे टप्पे पार पडतात. पण, यंदा निकाल जाहीर होऊनही प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. १० जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सोलापूरमधील ‘एसईबीसी’ची स्थिती

  • १५ मार्चनंतरचे अर्ज

  • ८,३००

  • अंदाजे प्रमाणपत्रे वितरित

  • ६,७००

  • प्रांताधिकाऱ्यांकडील प्रलंबित अर्ज

  • १,६००

शासनाकडून मार्गदर्शन मागविले जाईल

‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासंदर्भात २८ जूनला शुद्धीपत्रक निघाले असून नवीन परिपत्रकानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. पण, २८ जूनपूर्वी प्रमाणपत्रासाठी काहींनी अर्ज केले आहेत. तसेच यापूर्वी देखील अनेकांनी दाखले काढले आहेत. त्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविले जाईल.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.