Lok Sabha 2024: लोकसभेवरून रणसंग्राम; काँग्रेसने हट्ट सोडला नाही, तर...; राष्ट्रवादीच्या आमदाराचा इशारा

Lok Sabha 2024
Lok Sabha 2024ESAKAL
Updated on

गडचिरोली: सध्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली, तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रणसंग्राम सुरू झाला आहे.

ही जागा आपणच लढणार यावर काँग्रेस ठाम असल्याने ही लोकसभा लढविण्यासाठी सुरुवातीपासूनच तयारीत असलेले आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे इतर अनेक पर्याय उपलब्ध आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात आमदार धर्मरावबाबा आत्राम एक कसलेले, मुरब्बी राजकारणी मानले जातात. त्यांनी आमदारकीसोबतच राज्याचे राज्यमंत्री पदही भूषविले आहे.

त्यांनी आपली अहेरी विधानसभा त्यांची कन्या जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्यासाठी सोडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपल्या कन्येला उभे करणार असल्याचे कळते.

Lok Sabha 2024
Buldana: आमदार गायकवाड यांच्या प्रयत्नाने पंधरा वर्षांपासूनची मागणी पूर्ण; बुलडाण्यातील कृषी महाविद्यालयाला मान्यता

ते फार पूर्वीपासूनच गडचिरोली-चिमूर लोकसभा लढविण्याच्या तयारीत लागले आहेत. त्यांच्या मोकळ्या-ढाकळ्या थेट स्वभावामुळे त्यांनी आपला मनसुबा कधीही लपवून ठेवला नाही. ते आपण ही लोकसभा लढविणार हे सातत्याने सांगत आले आहेत.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आपला निर्धार कळवला होता. शरद पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात आल्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना लोकसभेच्या तयारीचे निर्देश दिले होते.

उलट या सगळ्या घडामोडी घडत असताना काँग्रेसने त्यावर कुठलेही भाष्य करण्याचे टाळले होते. कदाचित तेव्हा महाविकास आघाडीत फुट नको म्हणून ही दक्षता पाळली गेली असावी.

पण आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच काँग्रेस या लोकसभेवर दावा सांगू लागली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ही लोकसभा काँग्रेसनेच लढवली आहे.

त्यातही मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपकडून पराभूत झाली आहे. भाजपला तोडीसतोड टक्कर देऊ शकेल असा तोलामोलाचा उमेदवार सध्या काँग्रेस दिसून येत नाही.

अशा स्थितीत ही लोकसभा काँग्रेसनेच लढवली तर भाजपला आयते ताट वाढून देण्यासारखे होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अशा वेळेस ही लोकसभा धर्मरावबाबांनी लढवली तर जिंकण्याच्या काही आशा असू शकतात.

तरीही काँग्रेस या लोकसभेवरचा आपला हक्क सोडणे शक्य वाटत नाही. अशा स्थितीत धर्मरावबाबा आत्राम भाजपकडे तिकीट मागू शकतात. भाजपचे वाद चव्हाट्यावर येत नसले तरी तिथेही आलबेल नाही. त्यामुळे लोकसभा, विधानसभेत भाजप भाकरी फिरवेल, अशी चर्चा आहे. धर्मरावबाबा आत्राम यापूर्वीही भाजपमध्ये जाऊन आले आहेत.

भाजपनेही त्यांना स्वीकारले नाही, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. आर. यांचा बीआरएस पक्षही गालिचा अंथरून तयारच आहे. हे सगळे पर्याय नाहीच जमले, तर ते स्वबळावर अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्यात कमी करणार नाहीत.

Lok Sabha 2024
Chandrapur: मनपा पाणीपुरवठ्याच्या खासगीकरणाचा कट, सर्वपक्षीय माजी नगरसेवकांचा आरोप; एकाच कामाला तीन कंत्राटदार

'याल तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय पण लोकसभा लढवणारच' असा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळेच मागील अनेक महिन्यांपासून ते संपूर्ण लोकसभा पिंजून काढत आहेत.

मेळावे, सभा, लोकांशी थेट संवाद हे सगळे सुरूच आहे. त्यांचे गडचिरोलीचे येणे-जाणे वाढले आहे. त्यांच्यापरीने त्यांनी आपली मोर्चेबांधणी केली आहे.

लढाई सोपी नाहीच

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभेवर ९ वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. इकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या लोकसभेवरून जुंपली असताना भाजप कधीचीच कामाला लागली आहे.

त्यांची विविध समाजघटकांसाठी संमेलने सुरू आहेत.त्यांचे बुथप्रमुख, पन्ना प्रमुख कामाला लागले आहेत.

शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करीष्मा अद्याप कायम आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार बलाढ्यच राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार असो की राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम असो, ही लढाई अजीबात सोपी राहणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.