18 दिवसांत उजनी धरणात वाढले 9 टीएमसी पाणी! धरण उणे 43 टक्क्यांवर; आजपासून सोलापूर शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा 4 दिवसाआड

मॉन्सूनचे आगमन वेळेत झाले, पण अद्याप जिल्ह्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे. तरीदेखील आतापर्यंत झालेल्या पावसामुळे उजनी धरणात ७ जूनपासून नऊ टीएमसी पाणी आले आहे. उणे ६० टक्क्यांवरील धरण आता उणे ४३ टक्क्यांपर्यंत आले आहे.
solapur
उजनी धरणsakal
Updated on

सोलापूर : मॉन्सूनचे आगमन वेळेत झाले, पण अद्याप जिल्ह्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे. तरीदेखील आतापर्यंत झालेल्या पावसामुळे उजनी धरणात ७ जूनपासून नऊ टीएमसी पाणी आले आहे. उणे ६० टक्क्यांवरील धरण आता उणे ४३ टक्क्यांपर्यंत आले आहे. दरम्यान, धरण उणे ३५ टक्क्यांवर आल्यानंतर महापालिकेचे धरणावरील दुबार पंपिंग बंद होणार असून त्यामुळे महापालिकेचा लाखोंचा खर्च कमी होईल.

जिल्ह्यात वरुणराजाच्या भरवशावर सव्वा ते दीड लाख हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. उडीद, सोयाबीन, मूग, मका, कांदा, तूर, तीळ, कारळे अशा पिकांची पेरणी यंदा लक्षणीय आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पावसाने दडी मारली तरीदेखील शेतीला मुबलक पाणी मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. सध्या दौंडवरून धरणात दोन हजार ६०० क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. त्यातून १२ तासांत अर्धा टक्का पाणी वाढत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात कधी नव्हे तो धरणातील पाणीसाठा उणे ६० टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. पण, मॉन्सूनचे वेळेत आगमन झाले आणि सुरवातीला जिल्ह्यात विशेषत: धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने उजनीतील पाणीसाठा अवघ्या १८ दिवसांतच नऊ टीएमसीने वाढला आहे. त्यामुळे महापालिकेला तिबार पंपिंग बंद करावे लागले आणि त्यातून महापालिकेची जवळपास ६५ लाख रुपयांची बचत झाली. आता पावसाने दडी मारल्याने धरण प्लसमध्ये यायला वेळ लागेल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

आजपासून शहराला चार दिवसाआड पाणी

संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड करण्यात आला होता, पण आता ‘एमबीआर’वरील परिसर (जुळे सोलापूर, विडी घरकूल, शांती नगर, नेहरू नगर, आदित्य नगर, कर्णिक नगर, कुचन नगर, गुरूनानक चौक परिसर, नई जिंदगी हा भाग) वगळता उर्वरित संपूर्ण शहराला चार दिवसांआड पाणी मिळणार आहे. उद्यापासून (बुधवार) त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. उजनी धरणाची पाणीपातळी वाढत असून हिप्परगा, औज, चिंचपूर बंधाऱ्यातही ५० ते ६० दिवस पुरेल इतके पाणी आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘आषाढी’साठी सोडले जाणार चंद्रभागा नदीत पाणी

उजनी धरणात सध्या ४०.३९ टीएमसी पाणी आहे. आषाढी वारीसाठी देशभरातून पंढरपूरमध्ये अंदाजे १२ ते १५ लाख वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. त्यावेळी चंद्रभागेचे स्नान पवित्र मानले जाते. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून वारी काळात अंदाजे दीड टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्यासंबंधीचे नियोजन सध्या सुरू असल्याचे ‘जलसंपदा’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.