Sharad Pawar : महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी आपण एकत्र काम करू

'राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे. तुम्ही आणि मी वेगळे नाहीत, आपण सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्राचा चेहरा बदलवू'
Sharad Pawar
Sharad PawareSakal
Updated on

पुणे - 'राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे. तुम्ही आणि मी वेगळे नाहीत, आपण सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्राचा चेहरा बदलवू' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी भारत राष्ट्र समिती पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

राज्यातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) प्रमुख काही पदाधिकाऱ्यांनी निसर्ग मंगल कार्यालय येथे रविवारी पवार यांच्या उपस्थितीत 'बीआरएस'चे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी. जी. देशमुख, माजी खासदार हरिभाऊ राठोड, नानासाहेब बच्चाव, निखिल देखमुख, बाळासाहेब साळवे, महादेव बनसोडे, रुपेश पाटील यांच्यासह २० ते २५ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

यावेळी पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली "बीआरएस"ने राज्यात चांगले काम केले. पुढे काम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाचा पर्याय निवडत आज त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. आपल्याला सर्वांना मिळून एकत्र काम करायचे आहे, एकत्रित बसून निर्णय घ्यायचे आहेत.महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी आपण एकत्रित काम करण्याची आता गरज आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जबाबदाऱ्या निश्चित करतील, त्यानुसार आपण एकत्र काम करू.'

राठोड म्हणाले, 'शरद पवार ही आज महाराष्ट्राची गरज आहे. ७५ टक्के आरक्षण मर्यादा वाढविली, तर मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकते. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला देखील धक्का लागणार नाही. आम्हीं २५ ते ३० वर्षापासून भटक्या विमुक्त, ओबीसीसाठी काम करत आहोत. येत्या काळात शरद पवार यांच्या विचारांचे सरकार राज्यात येईल. पक्ष आम्हाला जे काम देईल ते काम आम्ही निष्ठेने करू.'

देशमुख म्हणाले, 'आम्ही राजकारणात कोणीही नव्हतो, तेव्हा भारत राष्ट्र समितीचे प्रमुख सीव्हीआर यांच्या माध्यमातून आम्ही लोकांशी जोडले गेलो. तेलंगणात पक्ष निवडणुकीत पडला, त्यामुळे पक्षाचे राज्यातील काम थांबले. राज्यात शेतकऱ्यांचे हाल चालू असून शेतमालाला भाव नाही. उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत.

अशा काळात आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरविले. राज्याच्या विकासात पवार यांची भूमिका महत्त्वाची असून सर्व घटकांसाठी त्यांनी काम केले आहे. आगामी काळात राज्यात शरद पवार यांच्या विचारांचे सरकार आणायचे असून आमच्या पक्षातील सुमारे ९० टक्के लोक आजपासून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.