India Alliance : ‘इंडिया’आघाडीसाठी फॉर्म्युला ‘महाराष्ट्रा’चा

वेध निवडणुकीचे : लोकसभेच्या चारशे जागांचे वाटप ‘मविआ’ तोडग्याने?
India Alliance lok sabha election
India Alliance lok sabha election sakal

मुंबई : देशातील ३५० ते ४०० लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार तातडीने घोषित करण्याचा विचार मुंबईतल्या बैठकीत पुढे आला असून त्यासाठी महाविकास आघाडीच्या धर्तीवर जागावाटप करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रातील नेत्यांनी मांडला आहे.

महाविकास आघाडीने ‘जिथे ज्याची शक्ती तिथे त्याला संधी’ हे तत्त्व स्वीकारले आहे. लोकसभेच्या जागावाटपात तेच अमलात आणत मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, हिमाचल प्रदेश या उत्तरेतील तर दक्षिणेतील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यातील जागावाटपच नव्हे तर निवडून येण्याची खात्री असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करावी, असा हा प्रस्ताव आहे.

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीनंतर सतत बैठका घेत बसण्याऐवजी कोण कुठे लढणार आहे, ते मतदारांसमोर ठेवण्याची गरज नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी हे बैठकीतून काही ठोस समोर यावे, याबाबत आग्रही होते.

नितीशकुमार यांनी तर मुख्य संयोजक ठरवण्यापेक्षा जागावाटप हा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे सांगताच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मविआच्या धर्तीवर ‘शक्ती तेथे संधी’ हा प्रस्ताव ठेवला.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या प्रस्तावाला दुजोरा देत ज्या राज्यात वाद नाहीत, तिथे जागावाटप सुरू करावे, असे नमूद केले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची ताकद जास्त असल्याने तेथे जागावाटपात अखिलेश यादव यांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावू द्यावी, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सुचवल्याचे समजते.

यूपीतील ८०, महाराष्ट्र ४८, बिहार ४०, राजस्थान २६ , मध्य प्रदेश २९, छत्तीसगड ११ अशा जागांबाबत चर्चा होऊ शकेल, अशी सूचना यावेळी पुढे आली. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंडच्या १४ जागांवरही चर्चा सुरू करू, असे त्यांच्यासमोरच सुचवण्यात आले.

काही माहीतगारांनी गुजरात, ओडिशा अशा ज्या राज्यात ‘इंडिया’ला यशाची फार संधी नाही, तेथेही उमेदवार सुचविण्यास हरकत नाही, असे मत मांडले. पश्‍चिम बंगाल आणि केरळ या राज्यांत ‘इंडिया’ आघाडीचे घटक पक्ष समोरासमोर उभे राहणार असल्याने तिथे सध्या चर्चा नको, असे ठरले आहे.

इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी जागावाटप प्रक्रियेस या चर्चेत अनुमती दिली. मोदी-शहांच्या नेतृत्वातील भाजपने धक्कातंत्र वापरत मुदतपूर्व निवडणुका घोषित केल्याच तर त्यास सामोरे जावे लागेल. या अनपेक्षित घोषणेची शक्यता ममता बॅनर्जी वर्तवत असून आता बैठकांमध्ये न रमता कामाला लागण्याबाबत त्या आग्रही आहेत. काँग्रेसने गंभीर व्हावे, अशी मागणी करत त्या बैठकीतून लवकर बाहेर पडल्या, हे उल्लेखनीय आहे.

अशोक चव्हाण यांना बैठकीत बोलावले!

शरद पवार यांच्याबरोबरच या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जागावाटप हा प्रतिष्ठेचा मुद्दा नसून मोदी राजवट संपवत लोकशाहीची प्रतिष्ठापना महत्त्वाची आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या मुख्य बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचा कोणीही प्रतिनिधी नसल्याचे लक्षात येताच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कार्यकारिणीचे नवनियुक्त सदस्य अशोक चव्हाण यांना बैठकीत बोलावून घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com