Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्र व मुंबईला तडाखा;पुण्यात पावसाचा विक्रम; कोल्हापूर, सांगलीवर पुराचे सावट

राज्यात बहुतांश भागांमध्ये हजेरी लावणाऱ्या पावसाने मध्य महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आजही कोसळत होता.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Updatesakal
Updated on

पुणे : राज्यात बहुतांश भागांमध्ये हजेरी लावणाऱ्या पावसाने मध्य महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आजही कोसळत होता. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला, तर विदर्भात पावसाने विश्रांती घेतली होती. मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सावध राहण्याच्या सूचना दिल्या.

मध्य महाराष्ट्राला, विशेषत: पुणे, कोकण आणि मुंबईला आज पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळित झाले. पुण्यात दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने आज पहाटेपासून चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे धरणसाठ्यामध्ये वाढ होऊन खडकवासला धरणातून विसर्ग सोडावा लागला. जुलै महिन्यात एका दिवसात पडणाऱ्या शहरातील तिसऱ्या सर्वांत मोठ्या पावसाची नोंद गुरुवारी सकाळी झाली. विशेष म्हणजे एकाच वर्षांत दोनदा विक्रम करण्याचा रेकॉर्डही यंदाच्या पावसाने प्रस्थापित केला आहे. ९ जून २०२४ रोजी ११७.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर अवघ्या ४६ दिवसांत गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत ११४.१ मिलिमीटर पाऊस कोसळला. पुण्यातील काही सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ आणि लष्कराच्या पथकांना पाचारण करावे लागले. ताम्हिणी घाटमाथ्यावर ५५६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

राजधानीत जनजीवन विस्कळित

मुंबईसह परिसराला मुसळधारेचा फटका बसला. संततधारेमुळे जागोजागी पाणी साचल्याने आणि नद्यांना पूर आल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. कर्जतच्या उल्हास नदीला पूर आल्याने शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. ठाणे जिल्ह्यात पावसाची कोसळधार सुरूच असल्याने ठाणे जिल्ह्याभोवती पुराचा वेढा वाढला आहे. उल्हास, काळू नदीने रौद्ररूप धारण केले असून अवघ्या काही तासांतच इशारा पातळीवर असलेल्या या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.

पुण्यात तिघांचा मृत्यू

पुणे : नदीपात्रातील पाणी वाढल्याने अंडा भुर्जीची गाडी सुरक्षितस्थळी हलविताना विजेचा धक्का लागून पुण्यात तीन तरुणांचा मृत्यू झाला. भिडे पुलाजवळील पुलाची वाडी परिसरात गुरुवारी (ता. २५) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. हे तिघे एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करीत होते. अभिषेक घाणेकर (वय २५), आकाश माने (वय २१) आणि नेपाळी कामगार शिवा परिहार (वय १८) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. धरणातून विसर्ग सोडल्याने अंडा भुर्जीची गाडी पाण्यात जाईल, या भीतीपोटी तिघे जण त्यांची गाडी सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी गेले होते.

पावसाचा धुमाकूळ

  • पुणे, पालघर, रायगड, मुंबई, सातारा जिल्ह्यांत शाळांना सुटी

  • दोन दिवसांत राज्यातील धरणांत ११६ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल

  • रायगड जिल्ह्यात मुसळधार, महाडमध्ये पूर

  • ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने मार्ग बंद

  • सावित्री, अंबा आणि उल्हास या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

  • ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर ही शहरे जलमय

  • शहापूर, मुरबाड तालुक्यांमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

  • मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचल्याने द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

  • नाशिकमध्ये तीन धरणे भरली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.