मुंबई - पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीसाठी खुद्द शरद पवार स्वाभिमान सभा घेत आहेत. आतापर्यंत येवला आणि बीडमध्ये झालेल्या स्वाभिमान सभेला जो प्रतिसाद मिळाला तो महाराष्ट्रानं पाहिला. आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती कोल्हापुरातील स्वाभिमान सभेची. पवारांच्या याच सभेचं अध्यक्षपद शाहू महाराज छत्रपतींनी स्वीकारलं आहे. त्यामुळे शाहू महाराजांच्या पुढच्या राजकीय प्रवासाची दिशा आणि महाविकास आघाडीचा कोल्हापूरचा उमेदवार ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे.
२५ ऑगस्टला शरद पवारांची कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेचं अध्यक्षपद थेट श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी स्वीकारलंय. त्यामुळे २०२४साठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत असतानाच लोकसभा उमेदवारांच्या नावांमध्ये आता पुन्हा शाहू महाराज छत्रपतींच्या नावानं जोर धरलाय.
कारण एकीकडे शिवसेनेनं राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं पण ते पाळलं नाही, असा आरोप चिरंजीव आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केला होता. भाजपानंही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे स्वराज्य संघटनेची स्थापना करत संभाजीराजेंनी आपलं वेगळं बस्तान मांडलं. त्यामुळे लेकाची राजकीय दिशा बदलल्यानंतर आता शाहू महाराज छत्रपतीच निवडणुकीच्या रिंगणात येणार असल्याचं बोललं जातंय.
याआधी शाहू महाराजांनी अनेकदा भाजपच्या वैचारिक भूमिकेवर हल्ले चढवलेत. पण पवारांची कोल्हापुरातली सभा राजकीय आहे. आणि त्या सभेचं अध्यक्षपद शाहू महाराज छत्रपतींनी स्वीकारल्यामुळे महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार ठरल्याची चर्चा आहे.
त्यातच शाहू महाराज छत्रपतींइतका सक्षम उमेदवार सध्यातरी महाविकासआघाडीकडे दिसत नाही. आता मविआकडून लोकसभेसाठी काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील, शिवसेनेचे संजय घाटगे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, बाजीराव खाडे, चेतन नरके ही नावं चर्चेत असल्याचं कळतंय. तर तिकडे शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटातून विद्यमान खासदार संजय मंडलिक, हसन मुश्रीफ इच्छुक उमेदवार असल्याचं बोललं जातंय.
शाहू महाराज छत्रपतींची उमेदवारी निश्चित झाल्यास महाविकासआघाडीला लोकसभेसाठी अतिशय प्रबळ उमेदवार मिळेल आणि त्याचा फायदा होईल. त्यासाठी पवारांनी ही फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे शाहू महाराज छत्रपतींना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास भाजपचा तगडा उमेदवार उभा करण्यासाठी दमछाक होणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे शाहू महाराज छत्रपती महाडिकांचा, मंडलिकांचा परिणामी भाजपाला घाम फोडणार का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.