मोठी बातमी! ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी दिलेल्या जातीच्या पुराव्यात खाडाखोड अन्‌ नव्या नोंदीचा संशय; जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून कसून चौकशी, मगच दाखल्यांचे वितरण

अभियांत्रिकी, फार्मसीसह व्यावसायिक शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दररोज ६०० ते ७०० अर्ज येत आहेत. अर्जातील प्रत्येक कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करूनच वैधता प्रमाणपत्रे वितरीत केली जात आहेत.
solapur
caste validity and caste certificateesakal
Updated on

सोलापूर : व्यावसायिक शिक्षण घेणारे किंवा अकरावी, बारावी विज्ञान शाखेतून शिकत असलेले विद्यार्थी, नोकरी व निवडणूक लढणाऱ्यांनाच जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. सध्या अभियांत्रिकी, डिप्लोमा, फार्मसीसह व्यावसायिक शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दररोज ६०० ते ७०० अर्ज येत आहेत. अर्जातील प्रत्येक कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करूनच संबंधितांना वैधता प्रमाणपत्रे वितरीत केली जात आहेत.

जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) काढण्यासाठी ‘एससी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १९५० पूर्वीचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे. तर ‘व्हिजेएनटी’साठी १९६१ पूर्वीचा तर ओबीसी, एसबीसी (एसईबीसी) प्रवर्गासाठी १९६७ पूर्वीचा पुरावा देण्याचे बंधन आहे. त्यासाठी महसुली किंवा शैक्षणिक पुरावे चालतात. ‘कुणबी’चे दाखले पूर्वीपासूनच दिले जात आहेत, पण आता राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के ‘एसईबीसी’ आरक्षण दिले आहे. या प्रवर्गातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज करत आहेत. इतर जात प्रवर्गातील विद्यार्थीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर अर्ज करीत असल्याचे चित्र आहे. मागील सहा दिवसांत २३०० तर जुलै महिन्यात पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्राप्त झाले आहेत.

दाखल प्रस्तावातील प्रमुख त्रुटी...

  • समितीकडे सादर केलेल्या अर्जासोबत निश्चित कालावधीतील पुरावे जोडलेले नाहीत

  • काही पुराव्यांच्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड केल्याचे दिसते

  • काही अर्जात जातीच्या नोंदी पुन्हा नव्याने केल्याचाही संशय

मूळ कागदपत्रांची पडताळणी, वेळप्रसंगी दक्षता पथकाकडून चौकशी

ज्या अर्जातील जातीच्या कागदपत्रात खाडाखोड किंवा पुन्हा नव्याने नोंद केल्याचा संशय वाटतो, त्यासंबंधीची मूळ कागदपत्रे तहसील कार्यालयातून मागवून घेतली जात आहेत. त्याची खात्री करून त्या अर्जावरील निर्णय होईल. वेळप्रसंगी काही प्रकरणात गावात जाऊन चौकशीची गरज भासल्यास त्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दक्षता पथकाचीही मदत घेतली जात आहे. ‘एसईबीसी’च्या विद्यार्थ्यांचे अर्ज सध्या जास्त असून त्यांना १९६७ पूर्वीचा पुरावा बंधनकारक आहे.

अर्जांची पडताळणी करून ‘व्हॅलिडीटी’चे वितरण

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे मागील काही दिवसांपासून व्हॅलिडिटीसाठी अर्जांची संख्या वाढली आहे. समितीकडील प्रत्येक अर्जातील पुराव्यांची शहानिशा तथा पडताळणी करून संबंधितांना जात वैधता प्रमाणपत्रे वेळेत दिली जात आहेत.

- सचिन कवले, सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.