ठाणे : ठाणे जिल्ह्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागच्या चार-पाच दिवसांपासून राज्यात मान्सूनने जोरदारपणे हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडत असल्यामुळे अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. यवतमाळमध्ये मागच्या २४ तासांमध्ये तब्बल २४० मीमी पावसाची नोंद झाली आहे.
पूस आणि पैनगंगा नदीला पूर आला त्यामुळे महागावातील अनेकजण अडकून पडले. हेलिकॉप्टर पाचारण करुनही दुर्घटनाग्रस्तांना बाहेर काढता आलं नाही. शेवटी एनडीआरएफच्या टीमने गावकऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं.
यवतमाळसह बुलढाणा, अकोला, मुंबई येथे मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. त्यातच आता तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे.
त्यामुळे लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.