solapur zp ceo manisha awhale
solapur zp ceo manisha awhale sakal

सीईओंचा दबदबा अन्‌ ‘जलजीवन’ला गती! ग्रामीण महिलांची थांबणार पाण्यासाठीची वणवण; सोलापूर जिल्ह्यातील ५.७६ लाख कुटुंबांना घरोघरी नळ कनेक्शन

केंद्र सरकारच्या ‘हर घर जल नळ’अंतर्गत जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागातील सोलापूर जिल्ह्यातील तब्बल पावणेसहा लाख कुटुंबांना स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्यातून प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी मिळेल.
Published on

सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘हर घर जल नळ’अंतर्गत जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागातील सोलापूर जिल्ह्यातील तब्बल पावणेसहा लाख कुटुंबांना स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्यातून प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी मिळेल. सध्या दीडशे गावांमध्ये योजनेची कामे पूर्ण झाली आहेत. या महत्वकांक्षी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा खाली उतरणार असून दुष्काळातील त्यांची पाण्यासाठीची वणवण देखील थांबणार आहे.

सोलापूर म्हंटले की दुष्काळ, पाणी व चारा टंचाई, पाण्यासाठी वणवण भटकंती असे समिकरणच झाले आहे. पण, विविध अडथळ्यांची शर्यत पार करून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनमधून ‘हर घर जल नळ’अंतर्गत डिसेंबर २०२४पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये ‘जलजीवन’मधून पावणेसहा लाख कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे मोफत नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या पाठपुराव्यातून योजनेतील कामांना गती प्राप्त झाली असून दर आठवड्याला योजनेच्या कामाचा आढावा घेतला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी योजना व निविदांबद्दल तक्रारी होत्या. त्या सर्व तक्रारींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्यात आला आहे. आता बहुतेक गावांमध्ये योजनेची कामे सुरू असून पुढील दोन महिन्यांत बहुतांश गावांमध्ये योजना कार्यान्वित कशी होईल, याचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दुष्काळीची तीव्रता कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, यादृष्टीने सध्या नियोजन करण्यात आले आहे.

महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबेल

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला जलजीवन मिशनमधून स्वच्छ व शुद्ध पाण्याचे नळ कनेक्शन दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून व अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे काही महिन्यांती सर्व कामे पूर्ण होतील, त्यावेळी सोलापूर जिल्हा निश्चितपणे टॅंकरमुक्त झालेला असेल. महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबेल आणि प्रत्येकाला त्या नळातून मुबलक पाणी मिळेल. त्यासाठी ग्रामपंचायतीचे पाण्याचे स्त्रोत देखील गरजेनुसार तत्काळ दुरूस्त केले जात आहेत.

- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

जलजीवनची सद्य:स्थिती

  • एकूण गावे

  • ८५५

  • योजनेचा आराखडा

  • ८३४ कोटी

  • नळ कनेक्शन मिळणार

  • ५,७६,६९१ कुटुंब

  • शाळा, अंगणवाड्यांनाही नळ

  • ७,५२५

उन्हाळ्याची चाहूल, तरी जिल्ह्यात ४ टॅंकर

एकेकाळी राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू व्हायचा. कधीकधी सर्वाधिक टॅंकर देखील सोलापूर जिल्ह्यात सुरू असायचे. पण, आता जलजीवनमुळे हे चित्र बदलत असून आगामी काळात या योजनेमुळे जिल्हा टॅंकरमुक्त होईल, अशी सर्वांनाच आशा आहे. यंदा पाऊस कमी झाला, उजनी धरण उणे ११ टक्के असून जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ तर इतर सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती आहे. तरीदेखील सध्या माळशिरस तालुक्यात दोन (पिंपरी, भांब) तर करमाळा (घोटी) व माढा तालुक्यात (तुळशी) प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहे.

टंचाई आराखड्यात टॅंकरसाठी ४४ कोटी

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई निवारण आराखड्यात यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात एक हजार २४१ टॅंकर लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ४३ कोटी ८५ लाख ४२ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या गावांमध्ये आता किंवा यापूर्वी टॅंकर लागले आहेत, त्या गावांमध्ये प्राधान्याने ‘जलजीवन’ची कामे केली जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.