महापालिका आयुक्तांमुळे तिढा सुटणार! वन विभागाच्या जागेतून जलवाहिनी टाकण्यासाठी आता नवा पर्याय; ‘या’ 3 ग्रामपंचायतींचा घ्यावा लागणार ठराव, झेडपी सीईओंना पत्र

सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे, पण राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण व वन विभागाच्या वादात जलवाहिनीसाठी पाकणी, हिवरे व चिखली या गावाजवळील वन विभागाची जागा उपलब्ध होत नसल्याने त्याठिकाणी काम थांबले आहे. त्यावर आता महापालिकेने कायद्याचा आधार घेत, वन विभागाला नवा प्रस्ताव सादर केला आहे.
Mahapalika aayukt solapur
Mahapalika aayukt solapursakal
Updated on

सोलापूर : सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे, पण राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण व वन विभागाच्या वादात जलवाहिनीसाठी पाकणी, हिवरे व चिखली या गावाजवळील वन विभागाची जागा उपलब्ध होत नसल्याने त्याठिकाणी काम थांबले आहे. त्यावर आता महापालिकेने कायद्याचा आधार घेत, वन विभागाला नवा प्रस्ताव सादर केला आहे. याशिवाय त्या तिन्ही ग्रामपंचायतींकडून वेळेत ठराव मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही महापालिकेने पत्र पाठविले आहे.

सोलापूर शहराला दररोज किंवा किमान एक-दोन दिवसांआड पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटीतून सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. सुरवातीला जलवाहिनी खासगी जमिनीतून नेण्याचे नियोजन होते आणि त्यासाठी बाधितांना जवळपास २५० कोटींचा मोबदला द्यावा लागणार होता. रक्कम मोठी असल्याने त्यावर पर्याय काढून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या जागेतून जलवाहिनी नेण्याची परवानगी घेण्यात आली. त्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाठपुरावा केला होता.

आता काम अंतिम टप्प्यात असतानाच पाकणी, हिवरे, चिखलीजवळ जलवाहिनीसाठी वन विभागाची जागा लागणार आहे. त्यासाठी पाठपुरावा करूनही वनविभाग व महामार्ग विकास प्राधिकरणाच्या वादामुळे महापालिकेला वेळेत जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी अत्यावश्यक कामासाठी (पाणीपुरवठा जलवाहिनी वगैरे) वन विभागाला एक हेक्टरपर्यंत जमीन देण्याचा अधिकार असल्याच्या नव्या नियमांचा अभ्यास करून त्याआधारे वन विभागाला नवा प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी तिन्ही ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेचे ठराव घ्यावे लागणार आहेत. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी ते ठराव मिळावेत म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

अडथळे दूर करुन लवकरच जलवाहिनीचे काम पूर्ण होईल

महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून कामाची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. वन विभागाच्या जागेतून (१२०० मीटर) पाइपलाइन नेण्यासाठी नवा पर्याय शोधला असून, त्यासाठी चिखली, हिवरे व पाकणी ग्रामपंचायतींकडून ठराव घेतले जातील. त्यानंतर अंतिम प्रस्ताव वन विभागाला सादर करून पाइपलाइनचे काम पूर्ण केले जाणार आहे. याशिवाय धरणाजवळील ८०० मीटर काम पोलिस बंदोबस्तात पूर्ण केले जाईल. टेंभुर्णी बायपासजवळील १८०० मीटर खासगी जागेच्या मोजणीसाठी शुल्क भरून बाधितांना मोबदला देऊन तेथील कामही लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका, सोलापूर

त्रुटींची पूर्तता करून ‘अमृत-२’चा प्रस्ताव ‘एमजेपी’कडे

समांतर जलवाहिनी झाल्यानंतरही सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी शहराअंतर्गत वितरण व्यवस्था सुधारावी लागणार आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी नव्याने पाइपलाइन टाकावी लागणार असून, अनेक ठिकाणी जलकुंभ बांधावे लागणार आहेत. त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून ८९१ कोटींचा निधी मिळावा म्हणून प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यातील त्रुटींची पूर्तता करून आता तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (एमजेपी) सादर करण्यात आला आहे. तेथून तो प्रस्ताव तांत्रिक व अंतिम मंजुरीसाठी नगरविकास विभागाला जाणार आहे.

समांतर जलवाहिनीची सद्य:स्थिती

  • एकूण अंतर

  • ११० किमी

  • एअर वॉल

  • २५०

  • वॉशआऊट वॉल

  • १५

  • ब्रेक प्रेशर टॅंक

  • आतापर्यंत काम पूर्ण

  • १०३ किमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.