Dilip Walse Patil : जिल्हा बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे मोठ्या प्रमाणात वाटप केले जाते. याउलट या बँकांमधील ठेवींचे प्रमाण मात्र वाढत नाही.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSakal
Updated on

पुणे - राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे मोठ्या प्रमाणात वाटप केले जाते. याउलट या बँकांमधील ठेवींचे प्रमाण मात्र वाढत नाही. त्यामुळे काही जिल्हा बँका या आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्या आहेत. या कमकुवत जिल्हा बॅंकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे अशा जिल्हा बँकांसाठी नवनवीन योजना व उपक्रम सुरू करण्याचा विचार असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (ता. १७) सांगितले.

वळसे पाटील यांनी पुणे येथे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीचा व पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला. या बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार प्रवीण दरेकर, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मानसिंगराव नाईक, विविध जिल्हा बॅंकांचे पदाधिकारी, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय सहनिबंधक उपस्थित होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले, ‘आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून या बँकांचा अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यादृष्टीने प्रस्ताव तयार करा. विशेषतः आर्थिक अडचणीतील नागपूर आणि नाशिक या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा कृती आराखडा सादर करण्याची सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेली आहे.

या बँकांची स्थिती सुधारण्यासाठी वेगळी योजना राबविण्याबाबत विचार करण्यात यावा. शिवाय जिल्हा बँक आणि विकास सोसायटीच्या आर्थिक क्षमतेच्या दृष्टीने नियोजन करावे. अधिकाऱ्यांनी नवीन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करावेत. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा बँकांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.’’ या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक स्थिती, पीककर्ज वाटप, कर्जवसुली आदी विषयांबाबतही चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांना पुरेसे पीककर्ज वाटप करण्याची सूचना

राज्यातील सर्वच जिल्हा बँकांनी पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विविध पिकांसाठी पुरेशा प्रमाणात व वेळेत पीक कर्ज वाटप करावे. कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे की नाही याची खातरजमा संबंधित जिल्हा निबंधक सहकारी संस्था किंवा साहाय्यक निबंधक यांनी खात्री करावी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत असलेली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com