Uddhav Thackeray : घोषणांचा पाऊस, अंमलबजावणीचा दुष्काळ;उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका

‘राम मंदिरापासून पेपरफुटीपर्यंत हे ‘लीक’ झालेले सरकार असल्याचा घणाघात करत विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sakal
Updated on

‘‘राम मंदिरापासून पेपरफुटीपर्यंत हे ‘लीक’ झालेले सरकार असल्याचा घणाघात करत विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याची टीका त्यांनी सरकारचा समाचार घेताना केली.

उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा ‘गाजर संकल्प’ असेल असे टोला लगावत सरकारने अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी करावी, लाडकी बहीण योजनेबरोबरच लाडका भाऊ योजना आणावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. त्याचबरोबर यापूर्वी जाहीर केलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासनांची पूर्तता केली, याची श्वेतपत्रिका देखील सरकारने काढावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. केंद्रातील सरकारला अयोध्येत नीट मंदिरही बांधता आलेले नाही. तिकडे मंदिर गळते आहे तर देशभरात पेपर ‘लिक’ होत असल्याचे टोला ठाकरे यांनी भाजपला मारला.

मुंबईतील ‘शिवालय’ येथे पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी महायुती सरकारवर उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली. घटनाबाह्य सरकारचे निरोप घेण्याचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून महाराष्ट्र या खोके सरकारला ‘बाय बाय’ म्हणत असल्याची शेरेबाजी त्यांनी केली. उद्याच कदाचित काही घोषणा होतील, अशी शक्यता व्यक्त करीत अर्थसंकल्पात जो काही घोषणांचा पाऊस पडेल ते पाहता हा ‘गाजर संकल्प’ असणार आहे. कारण पुढच्या तीन महिन्यात निधी खर्चच होणार नाही.

‘मुख्यमंत्र्यांची पंचतारांकित शेती’

राज्यात गेल्या दोन वर्षात सव्वा सहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून दिवसाला नऊ शेतकरी आत्महत्या करत असल्याबद्दल ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. ठाकरे म्हणाले, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकार थांबवू शकले नाही. मात्र राज्यात नव्हे तर देशात असा दुसरा कोणी शेतकरी नसेल जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो. आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमेला वेगळे पीक काढतो, असे ऐकले असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मध्य प्रदेशात ‘लाडली बहना’ अशी योजना आहे. तशीच महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजना हे सरकार आणतेय, असे ऐकले आहे. लाडकी बहीण योजना आणताय. मग तुम्ही मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका. लाडका भाऊ म्हणून योजना आणा. मुलींप्रमाणे मुलांनाही मदत करा.

- उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com