Sharad Pawar : विधानसभेला कमी जागा घेणार नाही

‘लोकसभा निवडणुकीत आपण कमी जागा लढलो, त्यापेक्षा जास्त जागा मिळायला पाहिजे होत्या. पण महाविकास आघाडीमध्ये मतभेद होऊ नयेत यासाठी सामंजस्याची भूमिका घेतली.
Sharad Pawar
Sharad PawareSakal
Updated on

पुणे - ‘लोकसभा निवडणुकीत आपण कमी जागा लढलो, त्यापेक्षा जास्त जागा मिळायला पाहिजे होत्या. पण महाविकास आघाडीमध्ये मतभेद होऊ नयेत यासाठी सामंजस्याची भूमिका घेतली. पण आता विधानसभा निवडणुकीत कमी जागा घेतल्या जाणार नाही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बैठकीत स्पष्ट करत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. संसदेच्या अधिवेशनात आक्रमकपणे मुद्दे मांडून सरकारला नामोहरम करा, असा सल्ला त्यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला.

पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक शुक्रवारी (ता. २१) पुण्यात निसर्ग मंगल कार्यालय येथील पक्ष कार्यालयात पार पडली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खासदारांची बैठक घेण्यापूर्वी शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.

‘लोकसभा निवडणुकीत आपण जास्त जागा लढू शकलो असतो, पण महाविकास आघाडीत वाद होऊ नयेत यासाठी १० जागा लढण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी ८ जागा जिंकल्या. याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच काम केल्यास राज्यात सत्तांतर निश्‍चित आहे. आपण आपले सरकार स्थापन करू शकतो. लोकसभेला जागा कमी लढल्या असल्या तरी विधानसभेला अशी स्थिती राहणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस जास्त जागांसाठी आग्रही असेल तुम्ही कामाला लागा,’ असे पवार यांनी बैठकीत सांगितले.

सायंकाळी नवनिर्वाचित खासदार व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये पवार यांनी निवडून आलेल्या खासदारांचे स्वागत केले. लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या खासदारांनी जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका मांडावी. मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणाचा मुद्दाही लावून धरावा अशा सूचना त्यांनी केल्या. विधानसभा निवडणुकीत जास्त जागा लढविण्यात येतील पण जागा वाटपावरून कोणत्याही पदाधिकाऱ्याने चुकीचे वक्तव्य करून मित्रपक्षांना दुखवू नये, असेही पवार यांनी बैठकीत सांगितले.

राज्यातील सामाजिक वातावरण बिघडणार नाही याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची आहे. सध्याच्या स्थितीला सरकार जबाबदार आहे. सर्व प्रश्‍न चर्चेने सुटतात. आजच्या बैठकीत राज्यातील दुष्काळ व अन्य प्रश्‍नांवर चर्चा झाली. हे मुद्दे विधानसभा निवडणुकीत आम्ही नागरिकांमध्ये घेऊन जाऊ.

- जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री

‘सामान्य जनता पवार साहेबांसोबत’

प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘सामान्य जनता पवार साहेबांसोबत आहे हे लोकसभेच्या निकालातून दिसून आले. या विजयाने आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे. याच पद्धतीने आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक एकत्र लढविणार आहोत. कोणता पक्ष किती जागा लढविणार यावर बैठकीत चर्चा होऊन निर्णय होईल. बारामतीतील पक्षाचा उमेदवारही शरद पवारच ठरवतील’.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.