Chandrashekhar Bawankule : ‘वक्फ’च्या जमिनी मूळ मालकांना मिळाव्यात; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अपेक्षा

‘वक्फ बोर्डाने तत्कालीन कायद्याचा आधार घेत हिंदू, आदिवासी व खासगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केले. त्या जमिनी वक्फ बोर्डाच्या नावाने करून घेतल्या होत्या.
chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankule Esakal
Updated on

मुंबई/नागपूर - ‘वक्फ बोर्डाने तत्कालीन कायद्याचा आधार घेत हिंदू, आदिवासी व खासगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केले. त्या जमिनी वक्फ बोर्डाच्या नावाने करून घेतल्या होत्या. या सर्व जमिनींबाबत तातडीने योग्य ती कारवाई करून त्या ज्या व्यक्ती, मंदिर किंवा संस्थांच्या मालकीच्या आहेत त्यांना परत कराव्यात. त्यासाठी रेकॉर्ड दुरुस्त करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे,’’ अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्ती करावी त्यासाठी उच्चस्तरीय समिती किंवा प्राधिकरण स्थापन करावे व त्यासाठी लागणारा पैसा सरकारने खर्च करावा असेही ते म्हणाले. स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत असेही त्यांनी नागपूरमध्ये बोलताना सांगितले.

‘मतदानानंतर बूथ लेव्हलवरून जो तपशील मिळाला आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या मतदानापैकी ५१ टक्के वाटा हा मुस्लिम मतदारांचा आहे. मागील दोन अडीच वर्षांत त्यांनी जी हिंदुत्वविरोधी भूमिका स्वीकारली त्या भूमिकेतून हे मतदान मिळाल्याचा अभिमान त्यांना असेल तर तो त्यांना लखलाभ असो,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.

‘मविआ’ला किरकोळ यश

महाविकास आघाडीतील घटक पक्ष किरकोळ यशाने हुरळून गेले आहेत. महायुती आणि ‘मविआ’च्या मतांमध्ये केवळ ०.३ टक्के फरक आहे. याचमुळे त्यांना मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळावे यासाठी उत्साह आला आहे. पाच मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडून जाहीर झालेले आहेत. पुढील पाच वर्षांत मोदी सरकारच्या योजना महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेपर्यंत पोहोचाव्यावा यासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आवश्यक आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर केंद्रातील एनडीए सरकारच्या सर्व योजना बंद करणे हाच एकमेव त्यांचा अजेंडा असेल त्यामुळे ‘मविआ’ला महाराष्ट्र मतदान करणार नाही असा टोला त्यांनी लगावला.

‘आमदारांनो, संवादात कमी पडू नका’

राज्यात पराभवाचे कारण योग्य संवाद साधण्यात आलेले अपयश असून आता सरकारने केलेली कामे जनतेत जावून सांगा, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली आहे. काल झालेल्या चार बैठकांत नेत्यांनी त्यांच्या मनातले तर बोलून दाखवले, पण एका प्रमुख कार्यकर्त्याने आमचेही प्रतिपादन ऐकावे असे वाटत होते, असे नमूद केले. मात्र काल बैठकीत नेत्यांनी काय चुकले, पुढे काय करावे, याबाबत मार्गदर्शन करावे असे सांगितले.

रात्री उशिरा मराठा आमदारांच्या बैठकीत ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार नेत्यांच्या सभा व्हाव्यात म्हणून आग्रह धरतात पण सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले हे सांगण्यात कचरतात काय, असा प्रश्न केल्याचे समजते. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते, असा निर्णय घेणारे शासन भाजपच्या नेतृत्वातील होते, हे सांगण्यात कमी पडलो काय याचा विचार करावा, असेही सुचवले गेले.

याबाबत आत्मपरीक्षण करावे, असे गंभीरपणे वाटून घ्या, अशी विनवणीवजा कानउघाडणी केल्याची चर्चाही सुरु आहे. मराठा समाजासाठी जे निर्णय घेतले होते ते जनतेत पोहोचले नाहीत की जरांगेंच्या आंदोलनात ते विरले यावरही चर्चा झाल्याचे समजते. आपण नरेटिव्हची लढाई हरलो, असे सांगून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटना बदलणार, अशी हाकाटी करण्यात विरोधक यशस्वी ठरले आणि आपल्याला उत्तर देण्यात यश आले नाही, असे वाटल्याचे नमूद केले.

विनोद तावडे फक्त उपस्थित

महाराष्ट्रातली विधानसभेची लढाई जिंकण्यासाठी राज्याला काही नेत्यांचे बळ पुरवले जाईल का याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. काल राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे कार्यकर्ता संमेलनात हजर होते. मात्र त्यांचे मनोगत, भाषण झाले नाही. ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील, असे वाटत असताना त्यांनी शांत रहाण्याचे नेमके कारण काय, असे विचारण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.