मार्चनंतर सोलापुरात पाणी टंचाईचे संकट! उजनी ४८ टक्क्यांवर, ६ मध्यम प्रकल्प तळाशी; टॅंकर सुरु करण्याची अशी आहे नियमावली

जिल्ह्याची संपूर्ण मदार असलेले उजनी धरण नोव्हेंबरच्या सुरवातीलाच ४८ टक्क्यांवर आहे. फेब्रुवारीतच धरण उणे होईल. मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा तळाशी गेल्याने अनेक गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच टॅंकर सुरु होतील, अशी सद्य:स्थिती आहे.
sakal exclusive
sakal exclusivesakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्याची संपूर्ण मदार असलेले उजनी धरण नोव्हेंबरच्या सुरवातीलाच ४८ टक्क्यांवर आहे. फेब्रुवारीतच धरण उणे होईल. मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा तळाशी गेल्याने अनेक गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच टॅंकर सुरु होतील, अशी सद्य:स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, सोलापूर शहराचा सध्याचा चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा फेब्रुवारीनंतर पावसाळ्यापर्यंत पाच ते सहा दिवसाआड होवू शकतो, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दोन, माढा व करमाळा तालुक्यात प्रत्येकी एक, असे चार टॅंकर सध्या सुरु आहेत. यंदाच्या पावसाळ्यात उजनी ६६ टक्क्यांपर्यंतच भरले. आता शेतीला दोन आवर्तने सोडली जाणार असून प्रत्येक ५० दिवसानंतर सोलापूर शहराला भीमा नदीतून एक आवर्तन सोडावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरण यंदा फेब्रुवारीतच उणे होणार आहे. त्याचा परिणाम एप्रिल ते जून या काळात सर्वच घटकांना सोसावा लागणार आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच यंदा सोलापूर जिल्ह्याची पाणीपातळी जवळपास एक मीटरने खाल गेली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात १००हून अधिक टॅंकर सुरु होतील, अशी स्थिती आहे.

सोलापूरकरांनो, पाणी जपून वापरा, संकट गंभीर

स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापुरात पाणी पुरवठ्यासाठी ‘स्काडा’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिसरातील पाणी दुसऱ्या कोणत्याही भागाला नेता येते अशी सोय झाली आहे. पण, मार्चनंतर पावसाळ्यापर्यंत सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ‘एनटीपीसी’कडील दोन पाइपलाइनमधील एक लाईन सोलापूर शहरासाठी द्यावी, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. दरम्यान, सोलापूरकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅंकर सुरु करण्यासाठी ‘ही’ नियमावली

ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाणी टंचाई निर्माण झाल्यास सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याच्या स्रोतापासून दीड किलोमीटर अंतरावर दुसरा खासगी स्रोत आहे का, याची पाहणी केली जाते. तसा स्रोत नसल्यास ग्रामपंचायतीकडून पाणी टॅंकर सुरु करण्याचा ठराव केला जातो. तो प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या उपअभियंत्यांना व गटविकास अधिकाऱ्यांना पाठविला जातो. भूजल सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या प्रस्तावाची पडताळणी होते आणि तो प्रस्ताव तहसीलदारांकडून प्रांताधिकाऱ्यांना पाठविला जातो. त्याठिकाणी भूजल अधिनियम २००९मधील कलम २५प्रमाणे टंचाई जाहीर करून टॅंकर सुरु करण्यास परवानगी दिली जाते.

मध्यम प्रकल्पातील उपयुक्त साठा (टीएमसीमध्ये)

  • प्रकल्प पाणीसाठा

  • एकरुख ०.९३

  • हिंगणी ०.०६

  • जवळगाव ०.२१

  • मांगी ०.०९

  • पिंपळगाव ढाळे ०००

  • आष्टी ०.१३

  • बोरी ०.०४

  • एकूण १.४१ टीएमसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.