Ashadhi Wari 2024 : त्यागाचे प्रतिक म्हणजे वारी

मानवी जीवनाचे उन्नयन साधण्यासाठी गुणसंपन्न होण्याबरोबरच आपल्या ठायी असलेले दुर्गुण सोडणे आवश्यक आहे. आपल्यातील दुर्गुणांना सोडण्याला ‘त्याग’ संबोधले आहे. हा त्याग एक मानवी जीवनमूल्य आहे.
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024sakal
Updated on

जीवनमूल्ये

डॉ. यशोधन महाराज साखरे

मानवी जीवनाचे उन्नयन साधण्यासाठी गुणसंपन्न होण्याबरोबरच आपल्या ठायी असलेले दुर्गुण सोडणे आवश्यक आहे. आपल्यातील दुर्गुणांना सोडण्याला ‘त्याग’ संबोधले आहे. हा त्याग एक मानवी जीवनमूल्य आहे. त्याग दोन प्रकारचा आहे. बाह्यत्याग आणि अंतःकरणातील त्याग. बाह्यत्याग म्हणजे आत्याचार, व्यभिचार, हिंसाचार इत्यादी पापाचरणाचा त्याग. आपण दुराचरण करीत नाही म्हणजे आपल्या मनात दुराचरण करावे, असा विचार येत नाही, असा त्याचा अर्थ नाही तर आपण दुराचरण करीत नाही, कारण त्यावर काही सामजिक, शारीरिक, अर्थिक मर्यादा अथवा बंधने आहेत. दुराचरण करण्याची भावना मनामध्येच न येणे याला ‘अंतरीचा त्याग’ असे म्हणतात.

श्रीमदाद्य शंकराचार्यांनी ‘त्याग’ या जीवनमूल्याची व्याख्या, ‘त्यागः संन्यासः।’ अशी केली आहे. याचा अर्थ त्याग म्हणजे संन्यास. संन्यास शब्दाचा अर्थ ‘सम्यक् न्यास’ असा आहे. ‘सम्यक् न्यास’ म्हणजे आपल्या साध्यास प्रतिबंधक अशा गोष्टींचा योग्य पद्धतीने योग्य वेळी केलेला त्याग. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास, ईश्‍वर प्राप्तीच्या मार्गामध्ये प्रतिबंधक अशा सर्व गोष्टींचा आणि इच्छांचा त्याग म्हणजे संन्यास. संन्यासाविषयी श्री तुकाराम महाराज म्हणतात, ‘वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग। संन्यास तो त्याग संकल्पाचा॥...’ याचा भाव असा की, दुष्टसंकल्पाचा त्याग करणे म्हणजे संन्यास.

त्यागाचे वर्म श्री ज्ञानेश्‍वर महाराज सोदाहरण पटवून सांगतात, ‘आतां मृत्तिकात्यागें घटु। तंतुत्यागें पटु। त्यजिजे जेवीं वटु। बीजत्यागें॥ कां त्यजुनि भिंतिमात्र। त्यजिजे आघवेंचि चित्र। कां निद्रात्यागें विचित्र। स्वप्नजाळ॥ नाना जळत्यागें तरंग। वर्षात्यागें मेघ। त्यजिजती जैसे भोग। धनत्यागें॥ तेवीं बुद्धिमंतीं देहीं। अहंता सांडूनि पाहीं। सांडिजे अशेषही। संसारजात॥ तया नांव त्यागु। म्हणे तो यज्ञांगु। हे मानूनि सुभगु। पार्थु पुसे॥’ याचा भाव असा की, मृत्तिकेचा त्याग केला असता जसा मडक्याचा सर्वथैव म्हणजेच सकारण त्याग होतो.

सुताचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग होतो. वटवृक्षाच्या बीजाचा त्याग केला असता वटवृक्षाचा त्याग होतो. सर्व भिंतींचा त्याग केला असता त्या भिंतीवरील सर्व चित्रांचा त्याग आपोआप होतो. झोपेचा त्याग केला असता नाना तऱ्हेच्या स्वप्नांचा त्याग होतो. पाण्याचा त्याग केला असता त्यावरील तरंगांचा त्याग होतो. वर्षाऋतूचा त्याग केला असता मेघांचा त्याग होतो अथवा धनाचा त्याग केला असता विषयोपभोगांचा आपोआप त्याग होतो. ज्ञानी व्यक्ती देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतेचा म्हणजेच ‘मी देह आहे’ या निश्‍चयाचा त्याग करतात. सर्व संसारमात्राचा कारणासह म्हणजेच अज्ञानासह त्याग करतात. त्याला त्याग असे म्हणतात. यास्तव अहंकाराचा त्याग हा सर्वात महत्त्वाचा त्याग आहे.

वारीमध्ये सर्व वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. तिथे हा कीर्तनकार, हा मोठा, हा छोटा असा कोणत्याही प्रकरचा अभिमान दिसत नाही. पंढरीच्या क्षेत्राची आणि पंढरीच्या वारीचे वर्णन करताना श्री तुकाराम महाराज म्हणतात, ‘पंढरीसी नाहीं कोणा अभिमान। पायां पडे जन एकमेका॥’ म्हणजेच वारीमध्ये अहंकार त्यागरूप जीवनमूल्य साधले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.