Pankaja Munde : पावणेपाच वर्षे टळलेली संधी ‘टायमिंग’मुळे जुळली; आगामी विधानसभा निवडणुकांचे गणित बांधून पंकजा मुंडेंना संधी

लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकांचे गणित बांधून भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिली.
Pankaja Munde
Pankaja MundeSakal
Updated on

Beed News : परळी विधानसभेतील पराभवानंतर पावणेपाच वर्षे पंकजा मुंडे यांना संविधानिक पदावर संधी मिळाली नाही. त्यांच्याकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नड्डाच आपले नेते असल्याचे वक्तव्य करुन राज्यातील भाजप नेत्यांना दुय्यम माणल्याने राज्यातील नेत्यांनीही त्यांच्यापेक्षा दुय्यम नेत्यांनाच स्थान दिले.

आता लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकांचे गणित बांधून भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यांच्यासाठी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन पावले पुढे टाकली आणि निकालानंतर त्याही चार पावले पुढे आल्याचे दिसले.

राज्यात मंत्री असल्यापासूनच पंकजा मुंडे व राज्य भाजप नेत्यांमध्ये फारसे सख्य नव्हते. परळीतील पराभवाला राज्यातील भाजप नेते व विशेषत: फडणवीसांचाच हातभार असल्याचा कायम आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. पंकजा मुंडे यांनीही कायम आपले नेते मोदी, शहा व नड्डाच असल्याचे ठणकावून सांगत.

अगदी लोकसभेच्या उमेदवारीबाबतही त्यांनी आपला रोख कायम याच पद्धतीने ठेवला. त्यांच्याकडून राज्यातील भाजप नेतृत्वाला दुय्यम ठरविले जात असल्याचा परिणाम म्हणून विधान परिषद, राज्यसभांवर नियुक्त्यांमध्ये व निवडणुकांमध्ये राज्य भाजपनेही कायम त्यांना ददुरच ठेवले. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपचा राज्यात मोठा अपेक्षाभंग झाला.

एकीकडे मनोज जरांगे यांचे टोकाचे मराठा आरक्षण आंदोलन आणि दुसरीकडे पंकजा मुंडे यांना टाळले जात असल्याने त्यांचा चाहता वर्ग भाजपापासून दुरावू नये यासाठी त्यांना विधान परिषदेच्या निमित्ताने संधी दिली आहे.

पंकजा मुंडे यांचा राज्यातील अनेक भागांत प्रभाव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्षाला फायदा होईल, असे मानले जाते. पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव मराठा आरक्षण्याच्या मुद्यावरून झाल्यामुळे ओबीसी आणि विशेषतः वंजारी समाजामध्ये भाजपच्या नेत्याबद्दल चीड निर्माण झाली होती. अगोदरच मराठा समाज विरोधात गेलेला असतांना आता पंकजा मुंडेंना दूर ठेवणे भाजपला परवडणारे नव्हते.

अनुभव, आक्रमकतेचा होईल फायदा

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय वारसदार असलेल्या पंकजा मुंडे संघटनात कुशल, भाषणात आक्रमक आणि मास लिडर आहेत. भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा, दोन वेळा आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी काम केलेले आहे. राज्यभर त्यांचा चाहता वर्ग आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या संघर्ष यात्रेचा भाजपला सत्तेत येण्यास फायदा झाला होता. आता त्यांना पक्ष किती वाव देतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.