छत्रपती संभाजीनगर: केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयातर्फे वाळूज औद्योगिक भागात दोनशे तर शेंद्रात ३० खाटाचे ईएसआयई हॉस्पिटल उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
यात मागणीनुसार आणखी वाढ केली जाईल, अशी माहिती केंद्रीय कामगार व पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी रविवारी (ता.११) पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रात मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देशभरात संपर्क से समर्थन या अभियान राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत नऊ वर्षांत झालेला विकास आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती केंद्रीय मंत्री यादव यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, उद्योग आणि कामगारांची वाढती संख्या लक्षात घेत नागरिकांच्या मागणीवरून वाळूजमध्ये २०० खाटांच्या रुग्णालयाला ९ मे रोजीच तत्त्वतः मंजुरी दिले आहे.
जास्त जागा उपलब्ध झाल्यास हे रुग्णालय ५०० खाटांपर्यंत केले जाईल. याशिवाय भविष्याचा विचार करून शेंद्रा एमआयडीसीतही सध्या ३० खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. तेथेही जास्त जागा उपलब्ध झाल्यास १०० खाटांचे हॉस्पिटल उभारले जाईल.
राज्यात ७ ठिकाणी कामगारांसाठी मोठे हॉस्पिटल उभारणार आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये शंभर खाटांचे रुग्णालयासह इतर ठिकाणचेही नियोजन आहे. यासोबतच ६५ ठिकाणी दवाखाने मंजूर केले आहे.
मागील ७० वर्षात ईएसआयसी हॉस्पिटलमधील खाटांची संख्या केवळ १८ हजारच होती. ती मागील ९ वर्षांमध्ये ३६ हजार झाल्या असल्याचेही कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, उत्तराखंडच्या खासदार कल्पना सैनी, आमदार प्रशांत बंब, यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरिष बोराळकर, समीर राजूरकर यांची उपस्थिती होती.
नऊ वर्ष लोककल्याणाचे
गेल्या ७५ वर्षात देशात केवळ ९१ हजार किलो मीटरचे रस्ते झाले. नरेंद्र मोदी सरकारने ९ वर्षातच ५८ हजार किलो मीटरचे रस्ते केले. हिंगोलीवरुन येताना समृध्दी महामार्गाने आलो एक चांगला अनुभव आला.
देशात ७४ नवीन एअरपोर्ट होण्यासाठी ७५ वर्षे लागली. तेवढीच विमानतळे गेल्या ९ वर्षात करण्यात आली आहे. डिजिटलायजेशन, व्यापार, उद्योग क्षेत्राचा विकास होत अर्थव्यवस्था बळकट झाली.
एवढेच नव्हे तर देशाला जी-२० शिखर परिषदेचा मान मिळाला. विधानसभा निवडणूकीसारखी स्थिती लोकसभा निवडणुकीत होणार नाही. उलट देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता यावी, यासाठी मतदारच अग्रही आहे.
यावेळी छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख भूपेंद्र यादव यांनी औरंगाबाद केल्याने चर्चेला उधाण आले.
राष्ट्रवादी आमच्या विरोधात
भाजप सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. मित्र पक्षाला नेहमीच सोबत ठेवले, मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका दिला. ते काँग्रेस सोबत गेल्याचा आरोपही यादव यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप सोबत येईल का या विषयी विचारले असता, यावर यादव म्हणाले ते आम्हाला पराभूत करण्यास निघाले आहेत.
सरकार पडेल हे सांगणारे संजय राऊत हे भविष्यवक्त आहे असा खोचक टोलाही यादव यांनी राऊत यांना लगावला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय पक्षश्रेष्ठी ठरवणार असल्याचेही श्री यादव म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.