ST Bus : एसटी बस झाल्या ढकलगाड्या! प्रवाशांसह चालक, वाहकांनाही होतोय मानसिक त्रास

एसटी महामंडळाच्या खिळखिळ्या झालेल्या बसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
Chhatrapati Sambhajinagar St Bus
Chhatrapati Sambhajinagar St Bussakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - एसटी महामंडळाच्या खिळखिळ्या झालेल्या बसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे मोडकळीस आलेल्या बसमुळे चालक-वाहकांचेही मनोबल खचले आहे. हातात मिळालेली बस वेळेत तर सोडा, असे आदेश असतात, पण ती बस प्रवास तरी पूर्ण करेल का? अशी भीती वाटते. अत्यंत वाईट परिस्थितीत बस चालवावी लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभाराने एसटीची वाताहत झाली. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे एसटीचे ब्रीदवाक्य आहे. हे ब्रीदवाक्य वास्तवात उतरविण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना खरोखर चांगल्या सोयी पुरवणे अपेक्षित आहे. मात्र, सोयी तर सोडाच, आता बसही भंगार झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात चालणाऱ्या बसगाड्यांची खूप वाईट परिस्थिती आहे.

...तर प्रवाशांचे हाल

प्रवासादरम्यान बस बंद पडल्यानंतर मागून जी बस येईल आणि तिच्यात जितके सीट रिकामे असतील, तितक्याच प्रवाशांना त्या बसमध्ये जाता येते. त्यानंतर उरलेल्या प्रवाशांसाठी पुन्हा दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागते. अनेकवेळा जागा असूनही मागून आलेल्या बसच्या वाहकांची बंद पडलेल्या बसमधील प्रवाशांना घेण्यास नकारघंटा असते. दुसऱ्या बसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवाशांना अत्यंत संघर्ष करावा लागतो. यात प्रवाशांचा चार तासांचा प्रवास आठ तास किंवा अधिक वेळेचा होतो.

मदतीसाठी दुसरी बस नाहीच

बस बंद पडल्यानंतर त्या बसमधील प्रवाशांचे हाल होऊ नये, म्हणून महामंडळाने तातडीने दुसरी बस पाठविणे अपेक्षित आहे. पूर्वी अशी सुविधा दिली जात होती. आता मात्र दुसरी बस पाठविली जात नाही. बस बंद पडली, तर मागून येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवले जाते. यात प्रवाशांचा कितीही वेळ गेला, तरी त्याचे महामंडळाला काहीही देणे-घेणे नाही. प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन केल्याशिवाय पर्याय नसतो.

प्रवासाचा वेळही वाढला

खिळखिळ्या झालेल्या बसमुळे प्रवासाचा वेळ वाढला आहे. पूर्वी पुणे जाणारी बस साडेचार ते पाच तासांत पोचत होती. आता वाहनांची बिकट स्थिती, त्यातच वाढलेली ट्रॅफिक यामुळे सहा ते सात तासांशिवाय प्रवास पूर्णच होत नाही.

ही परिस्थिती नाशिक, कोल्हापूर, सुरत, निजामाबाद, अकोला, अमरावती अशा लांब पल्ल्याच्या प्रवासाची आहे. जिल्ह्यालगतच्या ग्रामीण प्रवासाचा वेळ खिळखिळ्या बस आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे वाढला आहे. पूर्वी एक तासात जाणारी बस आता दीड ते दोन तास वेळ घेत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.

चालकांनाही बस बंद पडण्याची भीती

खिळखिळ्या झालेल्या बस चालविताना चालकांची दमछाक होत आहे. बसस्थानकावर अशा भंगार बस ताब्यात घ्या अन् प्रवासाला निघा, असे फर्मान सोडले जाते. बसची अवस्था पाहिल्यानंतर अनेक चालक बस ताब्यात घेण्यास तयार होत नाहीत. यामुळे दुसऱ्या चालकाचा शोध घेतला जातो, या चालकाच्या शोधमोहिमेत बसगाड्या उशिराने निघतात.

खडखड करत निघालेली बस कधी बंद पडेल, याची भीती कायम चालकाच्या मनात राहते. बस वेळेत तर सोडाच, पण प्रवासही पूर्ण करते किंवा नाही, अशी भीती चालकांना प्रवास पूर्ण होईपर्यंत कायम राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.