Beed News : गावच्या महसूल प्रमुखपदाची ‘नोकरीही आम्हाला नको रे बाबा’; 6 महिन्यानंतरही २८ तलाठी रुजूच नाहीत

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील १९२ तलाठी संवर्गाच्या पदांची भरती प्रक्रीया मागच्या वर्षी सुरु झाली. परीक्षा व निकालाची प्रक्रीया मार्च महिन्यात पूर्ण होऊन पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली.
28 Talathi have not joined
28 Talathi have not joinedsakal
Updated on

Beed News : एकीकडे शासनाकडून सरकारी कार्यालयांतील नोकर भरती केली जात नाही, भरती जाहीर केली तर परीक्षांचा घोळ, निकालाला उशीर अशा अनेक तक्रारी तरुण उमेदवार करतात. मात्र, दुसरीकडे गावातील महसूलचा प्रमुख असलेल्या तलाठी पदावर निवड झालेले २८ उमेदवार सहा महिन्यांपासून रुजूच झाले नाहीत. या उमेदवारांच्या रुजू होण्याची वाट प्रशासन पाहत असल्याने आता प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना विनाकारण वाट पहावी लागत आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील १९२ तलाठी संवर्गाच्या पदांची भरती प्रक्रीया मागच्या वर्षी सुरु झाली. परीक्षा व निकालाची प्रक्रीया मार्च महिन्यात पूर्ण होऊन पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली.

सुरुवातीला उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन निवड झालेल्या उमेदवारांकडून वैद्यकीय बोर्डाचे शारिरिक तंदुरुस्त प्रमाणपत्र, उमेदवार रहिवाशी असलेल्या जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांचे चारित्र्य प्रमाणपत्र घेत उमेदवारांना तलाठी पदाच्या नोकरीची ऑर्डर देण्यात आली. मात्र, या सहा महिन्यांच्या कालावधीत १९२ उमेदवारांपैकी केवळ १६४ उमेदवार या पदावर रुजू झाले आहेत.

त्यांचे प्रशिक्षणही सुरु आहे. उर्वरित २८ उमेदवार अद्याप रुजू झाले नाहीत. यातील काही उमेदवार शैक्षणिक कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रीयेत आले नाहीत, तर काही उमेदवारांनी पुढील चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय शारिरीक तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर केले नाही.

बहुदा यापैकी काही उमेदवारांना आपल्या जिल्ह्याच्या लगत किंवा जिल्ह्यात इतर या समकक्ष नोकरी मिळालेली असू शकते वा कोणाला चांगल्या हुद्द्याची नोकरी लागलेली असू शकते, यामुळे हे उमेदवार रुजू झाले नसावेत असा अंदाज आहे. दरम्यान, या उमेदवारांकडे आता प्रतीक्षायादीतील उमेदवारांचे लक्ष आहे.

प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आशा

दरम्यान, तलाठी संवर्गाच्या १९२ उमेदवारांच्या निवड यादीतील २६ उमेदवार रुजू झाले नसले तरी त्यांनी आपल्याला रुजू व्हायचे नाही असे पत्रही दिले नाही. प्रशासनाकडून या उमेदवारांच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितलेल्या संबंधित पोलीस अधीक्षकांकडेही पत्रव्यवहार केला आहे. मात्र, हे उमेदवार रुजू होत नसल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही रुजू करता येत नाही. आशेने प्रतीक्षा यादीतील उमेदवार प्रशासनाकडे विचारणा करत आहेत.

संबंधीत उमेदवारांना संपर्क करुन लेखी म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, ज्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र येणे बाकी आहे, त्या संबंधीत पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार सुरु आहे. निवड यादीतील उमेदवार रुजू झाले नाहीत तर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

- शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.