Eknath Shinde : सुडाचे राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

‘‘घरी बसून सरकार चालविता येत नाही. लोकांच्या सुखदुःखात सामील व्हावे लागते. ‘याला संपवेन, त्याला संपवेन,’ अशी भाषा महाराष्ट्राने कधी ऐकली नाही. त्यामुळे सुडाचे राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही,’’ असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

सिल्लोड, (जि. छत्रपती संभाजीनगर) : ‘‘घरी बसून सरकार चालविता येत नाही. लोकांच्या सुखदुःखात सामील व्हावे लागते. ‘याला संपवेन, त्याला संपवेन,’ अशी भाषा महाराष्ट्राने कधी ऐकली नाही. त्यामुळे सुडाचे राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही,’’ असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सुरुवात शुक्रवारी महिला मेळाव्याद्वारे येथे झाली. पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. ‘‘मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही. गरीब, कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे दुःख काय असते याची जाणीव आहे. विरोधकांना पोटदुखी होत आहे. त्यामुळे ते ‘याला संपवेन त्याला संपवेन’ अशी भाषा करीत आहेत. सुडाचे राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही. ‘मविआ’ द्वेषाचे राजकारण करीत आहे. या योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ‘ये तो अभी झाकी है, अभी दो महिने बाकी है’’ असे सांगत शिंदे यांनी राजकारणात अनेक घडामोडी घडणार असल्याचे सूतोवाच केले.

‘लाडकी बहीण’ कायमची

‘‘महिलांचे हात बळकट करणे, महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील. विरोधकांनी सुरू केलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका,’’ असे आवाहन शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही अर्ज भरून योजनेची सुरवात झाल्याचे जाहीर केले. शिंदे म्हणाले, की या योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते ही योजना जास्त दिवस टिकणार नाही, निवडणुकीपुरती ही योजना असेल, असा असा अपप्रचार करीत आहेत. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. वर्षभरापासून या योजनेवर काम सुरू होते. अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी अर्थसंकल्पातही ४५ हजार कोटींची तरतूद केली आहे.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे. त्यांनी लक्षात ठेवावे, की घरात बसून ‘फेसबुक लाइव्ह’वर चालविणाऱ्या नाकाम सरकारला घरी बसवून आमचे सरकार स्थापन झाले आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांना फसवून विरोधकांनी मतदान मिळविले.

जनता सुज्ञ आहे. आता घरी बसणाऱ्यांना नाही तर लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मोदींनाही कल्पना

‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना दिली होती. त्यांनीही या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते बिथरले व गोंधळले आहे. त्यामुळे ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. यासाठी न्यायालयात जात आहेत. परंतु एकनाथ शिंदे शब्दाला जागणारा माणूस आहे. या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना देणारच,’’ अशी ग्वाही शिंदे यांनी सांगितले.

२५ लाख बहिणींचे अर्ज मंजूर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आज अखेर ऑनलाइनच्या माध्यमातून जवळपास एक कोटी ४० लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील सुमारे २५ लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. लाभार्थींना १५ ऑगस्टपर्यंत लाभ द्यायचा असल्याने शासकीय यंत्रणा रात्रंदिवस कामात गुंतलेली आहे. यामुळे इतर योजना आणि नियमित कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येत आहे. योजनेसाठी नारीशक्ती दूत ॲपबरोबरच १ ऑगस्ट पासून पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अनेक अर्जांत त्रुटी आढळून येत आहेत. काही ठिकाणी तर या योजनेसाठी पुरुषांनीच अर्ज भरले आहेत.

लोकसभा पराभवानंतर ‘सर्वच लाडके’

‘‘लोकसभेच्या पराभवानंतर सरकारला ‘सर्वच लाडके’ व्हायला लागले आहेत,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. शासनाकडून दररोज होणाऱ्या नवनवीन घोषणांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पाटील म्हणाले, की तीन महिन्यांसाठी योजना राबवण्याचा सरकारने सपाटा लावला आहे. लोकसभेच्या निवडणुकीआधी महाराष्ट्रात त्यांना कोणीच लाडके वाटतं नव्हते. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो पराभव झाला, त्यानंतर मात्र त्यांना सर्वच लाडके व्हायला लागले आहेत. जे लाडके आहेत त्यांनादेखील माहित आहे की, हे केवळ दोन-तीन महिन्यांसाठीच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.