Gangapur Water Crisis : गंगापुरात ठणठणाट; नागरिकांना प्यावे लागते विकतचे पाणी

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून मागील काळात १७ कोटींची पाणी योजना ९ ते १० टक्के वाढीव दराने देऊनसुद्धा योजना योग्य रीतीने राबविली गेली नाही.
Gangapur Water Crisis
Gangapur Water CrisisSakal
Updated on

गंगापूर : उन्हाची काहिली वाढत असतानाच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी नदीचा पाणीसाठा कमी झाला आहे. शहरातील बोअर, साठवण तलावानेदेखील तळ गाठला असून, आता शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून मागील काळात १७ कोटींची पाणी योजना ९ ते १० टक्के वाढीव दराने देऊनसुद्धा योजना योग्य रीतीने राबविली गेली नाही. त्याचप्रमाणे १ कोटी रुपयांचे वॉटरमीटरदेखील पाण्यासह गायब झाले आहे.

दरम्यान, दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम दुरुस्तीवर खर्च केली. एवढ्या पैशांमध्ये आणखी नवीन योजना कार्यान्वित झाली असती. मात्र, रस्त्याच्या कामात गुंतलेल्या नगरपालिकेला पाणीप्रश्न दिसला नाही. पावसाने दगा दिल्याने टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पाण्याच्या उपलब्धतेपेक्षा नियोजनाचा अभावच जास्त दिसून येतो. त्यामुळे दरवर्षी शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

रोगराई वाढण्याची शक्यता

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नगरपालिकेने गोदाकाठावरील अमळनेर येथे यंत्रणा उभारलेली आहे. दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतराची पाइपलाइन टाकण्यात आली असून, तेथून पाणी आणून शहरातील नादुरुस्त फिल्टर प्लांटमध्ये सोडले जाते.

नंतर हेच पाणी प्रक्रिया न करताच शहरातील जलकुंभांमध्ये चढवून लोकांना पाजले जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन रोगराई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नव्वद टक्के लोक खासगी फिल्टर प्लांटमधून २० ते ३० रुपये प्रति जारप्रमाणे पाणी घेऊन तहान भागवीत आहेत. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

प्रचंड गाळ साचल्याने तलाव उथळ

शहराच्या उत्तरेला मोठा साठवण तलाव आहे, परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्याने तलाव उथळ झालेला आहे. महसूल प्रशासनाच्या मदतीने नगरपालिकेने साठवण तलावातील गाळ काढला, तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो आणि या पाण्याचा गरजेच्या वेळी वापरदेखील करता येऊ शकतो.

गंगापूर शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती झालेली आहे. यासाठी प्रशासनाने सुयोग्य नियोजन केल्यास जास्तीत-जास्त शहरवासीयांना पाणी देता येईल. प्रशासनाने यात लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा.

— ज्ञानेश्वर साबणे, नगरसेवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.