Raju Shetti : शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्ती द्या; राजू शेट्टी यांची सरकारकडे मागणी; राज्यात आजपासून आंदोलन

Loan Waiver To Farmers : शेतकरी कर्जाच्या जोखडातून मुक्त व्हावेत, शेतमालाला योग्य भाव मिळावा याकडे सरकारचे लक्ष वेधून घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
Raju Shetti
Raju ShettiSakal
Updated on

Latur News : उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकला जात आहे. त्यामुळे शेतीसाठी काढलेले कर्ज शेतकऱ्यांना फेडता आले नाही. कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

सरकारच्या जाचक धोरणांमुळे ही स्थिती ओढवली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली. सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना ठेच लागली. हे दुर्लक्ष कायम राहिले तर आगामी निवडणुकांत पाय रक्तबंबाळ होतील, असेही ते म्हणाले.

येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात उद्यापासून (ता. १) ‘वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती यशस्वी करून राज्याला कृषिप्रधान बनवले.

त्यांच्या जयंतीदिनी महुली (ता. पुसद) या त्यांच्या जन्मगावातून कर्जमुक्ती आंदोलनाला सुरवात करीत आहोत. शेतकरी कर्जाच्या जोखडातून मुक्त व्हावेत, शेतमालाला योग्य भाव मिळावा याकडे सरकारचे लक्ष वेधून घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज शिंदे पाटील, विजयकुमार जाधव, माणिक गायकवाड उपस्थित होते.

आमची बहीण, आम्ही सांभाळू

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. त्यावर शेट्टी म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून शेतमालाला योग्य भाव द्यावा. असे केले तर आमच्या बहिणींचा सांभाळ आम्हीच करू.

सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी सरकारला अशा योजना आणण्याची गरज भासणार नाही. सरकारचा सन्मान निधीसुद्धा आम्हाला नको. आंदोलन केल्याशिवाय पीकविमासुद्धा मिळत नाही, अशी स्थिती असल्याचे शेट्टी म्हणाले.

‘शक्तिपीठ’ महामार्ग कशासाठी?

मी स्वत: शेतकरी आहे. खडकावर शेती करण्याचा अनुभव आहे. आता सरकाररूपी खडकावर शेती करून शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळवून द्यायची आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याला कर्जमाफी देऊन दिलासा देणे गरजेचे आहे. असे असताना इतर अनावश्यक घोषणा सरकार करीत आहे.

शक्तिपीठ मार्ग हे त्यापैकीच एक उदाहरण आहे. राज्यातील एकाही भक्ताने शक्तिपीठ मार्गाची मागणी केलेली नाही. सध्याचा मार्ग सुस्थितीत आहे. असे असताना केवळ कंत्राटदारांना पोसण्यासाठी ‘शक्तिपीठ’ महामार्ग लादला जात आहे. त्याला आमचा विरोध राहील. विकासाला आमचा विरोध नाही. पण, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणार असाल तर त्याला विरोधच असेल, असे शेट्टी म्हणाले.

समृद्धी महामार्गातून अमाप पैसा कमवला गेला. त्या पैशांतूनच आमदार, खासदारांची खरेदी-विक्री झाली. आता सरकारला शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून कोणाला ‘शक्ती’ द्यायची आहे?

- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.