Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal

Ayodhay Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी - उद्धव ठाकरे

‘मातोश्री’ या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
Published on

मुंबई - अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना २२ जानेवारीला देशात जरूर दिवाळी साजरी करा; पण, गेल्या दहा वर्षांत देशाचे दिवाळे निघाले आहे त्याचीही चर्चा होण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे.

या सोहळ्याची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी. केंद्र सरकार राष्ट्रपतींना आमंत्रण देईल का हे माहिती नाही; परंतु, २२ जानेवारीला काळाराम मंदिरात येण्यासाठी आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करत आहोत, अशी माहितीही ठाकरे यांनी दिली.

‘मातोश्री’ या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. वर्षानुवर्षे प्रभू श्रीराम मंदिरासाठी चाललेल्या लढ्याला अंतिमत: सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अयोध्येत केवळ प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा नाही, तर ती राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे, असेही ते म्हणाले.

येत्या २२ जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेणार असून, त्यानंतर गोदातीरी आरतीही करणार आहोत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही जाहीरपणे आमंत्रित करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच शिवसेनेचे खासदार रीतसर आणि सन्मानपूर्वक हे आमंत्रण राष्ट्रपतींना देतील, असेही ते म्हणाले.

‘गद्दारांची घराणेशाही तुम्हाला प्राणप्रिय’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे लोकार्पण झाले. या वेळी बोलताना मोदी यांनी घराणेशाहीवर भाष्य केले. त्याचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, की गद्दारांच्या घराणेशाहीबद्दल पंतप्रधान काही बोलले नाहीत. याचा अर्थ गद्दारांची घराणेशाही तुम्हाला प्राणप्रिय असल्याचे दिसते. घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने भाष्य केले असते तर बरे झाले असते, असा घणाघातही त्यांनी केला.

‘तेव्हा तुम्ही कोठे होता?’

राम मंदिराच्या निर्माणात कारसेवकांचे मोठे योगदान असून, त्यांना विसरता येणार नाही. अनेक कारसेवक आज आपल्यात नाहीत; पण, जे आपल्यात आहेत हा त्यांचा गौरव आहे. कारसेवकांनी धाडस केले नसते, तर आजचे राम मंदिर झाले नसते.

कारसेवक बाबरीच्या घुमटावर चढले नसते, तर आज जे घुमटावर झेंडे लावणार आहेत ते चढूही शकले नसते. झेंडे लावायला अनेक येतात मात्र, लढण्याची वेळ होती तेव्हा तुम्ही कुठे होता? या प्रश्नाचे उत्तर आज झेंडे लावणाऱ्यांकडे नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.