मुंबईतील सर्व रेल्वे पोलीस ठाण्यात 'पालघर पॅटर्न' राबविला जाणार - कैसर खालिद

IPS quaiser khalid
IPS quaiser khalidsakal media
Updated on

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर 15 ऑगस्टपासून दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. अनलॉकमुळे होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन कसे करणार, शिवाय अलिकडे फटका गँगची वाढलेली दहशत आणि महिला सुरक्षेचा प्रश्न कसा सोडवणार ? या संदर्भात लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांची घेतलेली ही मुलाखत.

15 ऑगस्टपासून प्रवाशांची गर्दीत भर पडणार आहे, याचे नियोजन कशाप्रकारे केले जाईल ?

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या 2 लाखांहून अधिक प्रवाशांना मासिक पास उपलब्ध करुन देण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनचे बंद केलेले प्रवेशद्वार उघडण्यात येणार आहे, आणखीन काही प्रवेशद्वारांची व्यवस्था केली जाईल. वाढलेल्या गर्दीच्या नियोजनासाठी पादचारी पूल, जिने, स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात येईल.

अलिकडे फटका गँग सक्रीय झाली आहे, प्रवाशांचे मोबाईल, वस्तु चोरीला जात आहे. त्यासाठी काय उपाययोजना सुरू आहेत ?

मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा फटका गँगचे प्रमाण कमी झाले आहे. फटका गँगचे जाळे कुठे आहे, कोणत्या वेळी होतो आणि का होतो याचे सर्वेक्षण आम्ही केले, मागील 10 वर्षातील सक्रिय असलेल्या गुन्हेगारांचे विश्लेषण केले गेले. त्यानंतर आरपीएफ, ड्रोनद्वारे सर्व फटका पाँईटची तपासणी केली. गँगचा उपद्रव असलेल्या परिसरात सुरक्षा रक्षकांची गस्त वाढविण्यात आली. या शिवाय प्रवाशांनी फटका गँगपासून सावधान राहावे यासाठी लोकल, रेल्वेस्टेशनवर वांरवार उद्घोषणा केली जात आहे. दरवाज्यावर मोबाईलव बोलणारे प्रवासी त्यांचे मुख्य लक्ष असतात. त्यामुळे प्रवाशांनीही अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे.

महिला सुरक्षेविषयी काय उपक्रम सुरू केले आहेत ?

पूर्वीपेक्षा आता महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. यासह महिलांच्या कामाच्या वेळादेखील बदलल्या आहेत. सकाळच्या पहिल्या लोकलपासून ते शेवटच्या लोकलपर्यंत महिला प्रवासी लोकलचा प्रवास करतात. त्यामुळे लोकलच्या महिला डब्यात सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्रीपर्यंत गस्ती घालणे, स्थानकावर रेल्वे पोलीस तैनात केले जाते. महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. पॅनिक बटणेची सुविधा महिला डब्यात दिली आहे. प्रत्येक महिलेचा प्रवास शेवटच्या स्थानकापर्यंत सुरक्षित होणे, याच ध्येयाने रेल्वे पोलीस काम करत आहेत.

पालघर रेल्वे ठाण्याच्या यशाबाबत काय सांगणार ?

प्रवाशांना सेवा देणे हे प्रत्येक सुरक्षा कर्मचारी, अधिकाऱ्यांचे काम आहे. माझ्या खांद्यावर भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) लिहिले आहे. यामधील 'सेवा' या शब्दाला खूप महत्त्व आहे. नागरिकांच्या करामधून आमचा पगार होतो. त्यामुळे प्रवाशांना प्राधान्याने, त्वरीत सेवा देणे आवश्यक आहे. प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्यातून गुन्ह्यांचा शोध घेणे, गुन्ह्यांचा उलगडा करणे ही कामे सुरू आहेत. त्यामुळेच पालघर रेल्वे पोलीस ठाण्याला हे यश मिळाले. यामागे सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारांच्या कामगिरीमुळे शक्य झाले. त्यामुळे यापुढे 'पालघर पॅटर्न' मुंबईतील सर्व रेल्वे पोलीस ठाण्यात राबवून प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सुरक्षित होण्याचे ध्येय आहे.

कमी मनुष्यबळामुळे रेल्वे गुन्ह्यांची उकल करणे कठिण जात आहे का ?

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाची हद्द चर्चगेट ते गुजरात सीमेपर्यंत, सीएसएमटी ते कसारा, खोपोली, पनवेल रेल्वे स्थानकांपर्यंत आहे. यासर्व ठिकाणातील नागरिक मुंबईत नोकरी, व्यवसायासाठी येतात. परिणामी, एका दिवसाला मध्य आणि पश्चिम रेल्वेने 75 ते 80 लाख प्रवासी उपनगरीय लोकलमधून प्रवास करतात. यामध्ये महत्त्वाच्या स्थानकातून दर एका मिनिटांला 1 हजार 500 प्रवाशांची रहदारी होते. यासह लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवाशांची वर्दळ असते. या सर्वाची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर आहे. मात्र, रेल्वे पोलिसांकडून प्रत्येक गुन्ह्यांची दखल घेतली जाते. मागील पाच वर्षाच्या प्राप्त तक्रारीच्या तुलनेत गुन्हे नोंदणीचे प्रमाण 100 टक्के आहे. तर, 65 टक्के गुन्ह्यांचा शोध घेतला जातो. हे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे.

मनुष्यबळ वाढविण्यासाठी कोणते नियोजन सुरू आहे ?

मनुष्यबळासह तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मनुष्यबळ हे महत्त्वाचेच आहे. मात्र, रेल्वे पोलिसांवर होणार खर्च हा 50-50 टक्के केंद्र आणि राज्य सरकार करते. रेल्वे पोलिसांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. तर, सध्या राज्य सरकारकडून 2 हजार होमगार्ड पुरविण्याविषयी चर्चा सुरू आहे. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासह सध्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 150 जवान कार्यरत आहेत. तर, 2019 पासून 20 टक्के जागा या रिक्त असून आता या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

रेल्वे अपघात टाळण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत ?

प्रत्येक प्रवाशाचा प्रवास हा धावता असतो. अनेकजणवेळ वाचविता यावा आणि जिना चढण्यासाठी कंटाळा करणारे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे 3 ते 3,500 लोक मरण पावतात. तर, इच्छितस्थळी लवकर पोहचण्यासाठी धावती ट्रेन पकडतो, दारावर लटकून प्रवास करतो. धावत्या गाडीतून पडणे, खांबाचा जोरदार फटका बसणे अशा घटना होतात. अनेक घरातील कर्ता पुरूष यामध्ये दगावतो. मात्र, रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी जनजागृती करणे, रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या ठिकाणी गस्ती घालणे, गर्दीचे नियोन करणे असे प्रयत्न सुरू आहेत.

प्रवाशांना तक्रार नोंदविण्यासाठी खूप वेळ लागतो, ही समस्या कशाप्रकारे सोडविणार ?

पोलीस ठाण्यात दररोज 10 ते 20 गुन्ह्यांची नोंद होते. तर, महत्त्वाच्या स्थानकावरील पोलीस ठाण्यात कधी 40 गुन्ह्यांची नोंद होते. प्रत्येक तक्रारदाराची तक्रार नोंदविली जातेच. काही वेळा ऑनलाइन तक्रार रजिस्टर करताना उशीर लागतो. त्यामुळे प्रवाशांना वेळ वाया जातो. हे थांबविण्यासाठी ऑफलाईन गुन्हा फॉर्म भरून नंतर ऑनलाइन रजिस्टर करण्यावर काम सुरू आहे. यासह आता आसनगाव, उल्हासनगर, बदलापूर, भाईंदर येथे नवीन रेल्वे पोलीस ठाणे बनविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे इतर रेल्वे पोलीस ठाण्यावर येणारा भार कमी होईल.

'पेपरलेस' कामासाठी 'एम पोलीस' अँपचे काम कुठपर्यंत आले आहे ?

एम पोलीस अँप सुरू करताना त्यामध्ये काही उणिवा आढळून आल्या होत्या. त्यामुळे सध्या हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या काळामध्ये सर्वकाम पेपरलेस होत आहे. ई-मेल करणे, व्हिडीओद्वारे संवाद साधणे सुरू आहे. यासह नवीन ऑनलाईन पद्धतीने काम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चोरीच्या घटना कमी करण्यासाठी काय उपाययोजना सुरु आहेत ?

रस्ते मार्गावर किंवा अन्य कुठल्या ठिकाणी मोबाईल, पर्स, मौल्यवान वस्तू चोरी केली. तर, त्याचा पाठलाग करता येतो. मात्र, 70 ते 80 प्रति तास किमी वेगाने धावणाऱ्या लोकलमधून चोरीची घटना झाली. तर, त्या चोराचा पाठलाग करणे शक्य नाही. चोरी करणारा पटकन उतरून पसार होतो. त्यामुळे अशावेळी त्वरीत 1512 क्रमांकावर संपर्क प्रवाशांनी केला पाहिजे. तसेच घटना घडलेल्या मागील किंवा पुढील स्थानकावर जाऊन संबंधिक रेल्वे कर्मचाऱ्याला माहिती देणे आवश्यक आहे. रेल्वे पोलिसांद्वारे याचा त्वरीत शोध घेतला जातो. तसेच आता सीसीटीव्ही डेटा, डेटा डिजिटलायझेनश, क्राॅस चेकिंग डेटा, सीटीची डेटा याचे सर्व एकत्रीकरण करणे सुरू आहे. तर, नावीन्यपूर्ण सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. नवीन कंट्रोल रूम तयार केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगाराचा पकडणे शक्य होणार आहे. आतापर्यंत रेल्वे पोलिसांनी हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यांमधून गुन्हेगारांना यशस्वीरित्या पकडले आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन काळातून काय शिकायला मिळाले ?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत श्रमिकांना त्यांच्या मुळगावी पोहचविणे हे खूप मोठे आव्हान होते. गर्दीचे नियोजन करण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यातून शिकून दुसऱ्या लाटेत ऑफलाईन तिकिट देण्याची पद्धत बंद केली.श्रमिकांना रेल्वे स्टेशनवर सहा ते आठ तास आधी बोलविण्यात आले. पहिल्या लाटेत एलटीटीवरून जास्त ट्रेन सोडल्या जात होत्या दुसऱ्या लाटेत एलटीटीसोबत सीएसएमटी, पनवेल, वांद्रे टर्मिनस येथून गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करता आले. कोरोना काळात रेल्वे पोलिसांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यात आली. गेल्या वर्षी 6 रेल्वे पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मृत्यूदर कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो. दुसऱ्या लाटेत 2 रेल्वे पोलिसांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.