लोक अदालतीमध्ये तडजोडीतून २५ कोटींची रक्‍कम जमा

लोक अदालतीमध्ये तडजोडीतून २५ कोटींची रक्‍कम जमा

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९ : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत, या हेतूने शनिवारी (ता. २८) रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. वादपूर्व व दाखल अशी एकूण १३,५२९ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आल्‍याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण देशभर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित लोकअदालतीमध्ये ५०,७०९ वादपूर्व प्रकरणे व ९,१३२ प्रलंबित अशी एकूण ५९,८४१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १२,१७३ वादपूर्व प्रकरणे व १,३५६ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण १३,५२९ प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोकअदालतीमध्ये निकाली निघाली आली. त्याद्वारे पक्षकारांना एकूण २५ कोटी ५८ लाख ६७ हजार ०३६ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांत २७ लोकअदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलचा वापर करूनही प्रकरणे मिटवण्यात आली. लोकन्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील, जिल्हा परिषद, रायगड पोलिस अधीक्षक यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

चार जोडप्यांचा संसार जुळला
रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात जोडप्याचा (पेण दोन, रोहा एक, खालापूर एक) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. संसारातील वादामुळे या जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केले होते. त्यांच्यातील वाद दूर करण्यात यश आले असून जोडप्यांनी वाद विसरून पुन्हा नव्याने संसार सुरू केले आहेत.

अपघातांची दोन कोटी ३९ लाखांची भरपाई
जिल्ह्यामध्ये एकूण २५ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ७०० रुपये इतकी नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अलिबाग येथील पक्षकारांचा जिल्हा न्यायाधीश डॉ. सृष्टी नीळकंठ व पॅनलवरील न्यायाधिशांनी सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.