बारवी नदीकाठच्या गावांत सतर्कतेचा इशारा

बारवी नदीकाठच्या गावांत सतर्कतेचा इशारा

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : बारवी धरण परिसरात संततधार पाऊस होत असून धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. रविवारी (ता. ४) सकाळी धरणातील पाणीपातळी ही ७१.५२ मीटर झाली आहे. बारवी धरणाची उंची ही ७२.६० मीटर आहे. पावसाचा जोर पाहता धरण लवकरच भरण्याची शक्यता असून धरणावरील स्वयंचलित दरवाजे उघडले जातील. यामुळे बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पात्रात उतरण्यास पर्यटकांना बंदीची सूचना तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर कराव्यात, असे पत्रदेखील एमआयडीसीने तहसीलदारांना पाठविले आहे.

एमआयडीसीच्या बारवी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. बारवी धरण, तसेच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी धरणातील पाणीपातळी ७१.५२ मीटर एवढी असून बारवी धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. बारवी धरणाची उंची ७२.६० मी असून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरणात येणारा पाण्याचा स्रोत वाढला आहे. त्यामुळे बारवी धरणाची पातळी वाढून बारवी धरणाचे स्वयंचलित वक्रद्वारे (गेट) येणाऱ्या काही दिवसांत उघडण्याची शक्यता आहे. परिणामस्वरूप बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल. त्यामुळे बारवी नदीकाठच्या विशेषतः आस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली व नदीकाठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा, तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सतर्कतेच्या सूचना देण्याची विनंती एमआयडीसीने केली आहे.

विसर्ग काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिक व पर्यटकांना प्रवेश देऊ नये, तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करण्याबाबत सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, अशी विनंती अंबरनाथ एमआयडीसी बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड तहसीलदारांना पत्र पाठवून केली आहे.

नद्यांनी धोक्याची पातळी गाठली
मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. बदलापुरातून वाहणारी उल्हास नदी धोका इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे, तर मोहने, जांभूळपाडा येथून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काळू नदीनेही धोक्याची इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि शहरांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.