आपण आपल्याच भाषेला दुय्यम का मानायचं? मराठीबद्दल अस्मिता हवीच; काय म्हणाल्या ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर?

Dr. Tara Bhavalkar : ‘मराठीला अभिजात भाषेचा (Marathi Classical language) दर्जा सरकारी पातळीवर मिळाला, याचे समाधान आहे.
Dr. Tara Bhavalkar
Dr. Tara Bhavalkaresakal
Updated on
Summary

''मराठी भाषक म्हणून जर आपल्याला मराठी टिकावी वाटत असेल तर आपली जबाबदारी अधिक आहे. आपण मराठी शाळा टिकविल्या पाहिजेत.''

सांगली : ‘‘मराठी भाषेचा गर्व नव्हे तर अस्मिता आपण जपली पाहिजे. जोपर्यंत कोणतीही भाषा सामान्य माणसांच्या चलनात असते तोवरच ती टिकते. त्याचवेळी ती आपल्या सर्व व्यवहारात आणण्याने ती समृद्ध होते,’’ असे मत दिल्ली येथील नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) नियोजित अध्यक्ष, लोकसाहित्याच्या संशोधक प्रा. तारा भवाळकर (Prof. Tara Bhavalkar) यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केले. निवडीनंतर त्या आपल्या वाटचालीविषयी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘‘मराठीला अभिजात भाषेचा (Marathi Classical language) दर्जा सरकारी पातळीवर मिळाला, याचे समाधान आहे. मात्र, प्रामाणिकपणे सांगायचे तर अशी मागणी आजच होतेय आणि आताच होतेय, असे मात्र नाही. अगदी समाजात नेहमीच उच्चभ्रूंच्या भाषेला-संस्कृतीला सन्मान दिला जातो. जी सर्वसामान्यांची भाषा-संस्कृती असते ती डावलली जाते. आपल्या संतांनी तर त्या काळात फार मोठी तक्रार केली आहे. त्यांच्या काळात संस्कृतला अधिक सन्मान दिला जायचा. जे पूर्वी संस्कृतबाबत होते तेच आता इंग्रजीबाबत होते.

Dr. Tara Bhavalkar
भारत हिंदू राष्ट्र होणार? RSS प्रमुख मोहन भागवतांच्या 'त्या' विधानाने चर्चेला उधाण, काय म्हणाले भागवत?

तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य जनांची भाषा जिला प्राकृत म्हणतात. प्राकृत म्हणजे प्रकृतीने-निसर्गाने निर्माण केलेले. मराठी ही निसर्गतः निर्माण भाषा आहे. महानुभव पंथियांनी, चक्रधरांनी ही सामान्यांची भाषा आहे, हे ठासून सांगितले. संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ महाराज यांना संस्कृतमध्ये लिहिता आले नसते असे नाही. मात्र, त्यांनी सामान्यांच्या भाषेत ‘ज्ञानेश्‍वरी’, ‘भावार्थ रामायण’ लिहिले. संत एकनाथ सवाल करतात, ‘‘संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून आली?’’ आजही आपल्या भाषेला दुय्यम मानले जाते. मात्र, आपण आपल्याच भाषेला दुय्यम का मानायचे? आपल्याला मराठीबद्दल अस्मिता हवी.

एक लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा सामान्य माणूस भाषेला चलन-व्यवहारातून डावलतो तेव्हा ती भाषा संपते. तेच चालीरितींचे आहे. मराठी भाषक म्हणून जर आपल्याला मराठी टिकावी वाटत असेल तर आपली जबाबदारी अधिक आहे. आपण मराठी शाळा टिकविल्या पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या चालीने जरूर जावे. मात्र, मराठीत बोलले पाहिजे. मराठी शाळा टिकविल्या पाहिजेत. कारण आपली मुळे विसरता कामा नये. ही मुळे मराठीत रुजली आहेत. तिथून आपले पोषण होते आहे.’’

Dr. Tara Bhavalkar
'उत्तरे'त ठिणगी, 'दक्षिणे'त वणवा; खासदार महाडिक-क्षीरसागर यांच्यातील वादाला तोंड फुटण्याची शक्यता, काय आहे कारण?

लोकसाहित्य-संस्कृतीच्या संशोधनाच्या प्रवासाबद्दल प्रा. भवाळकर म्हणाल्या, ‘‘लोकसाहित्य-संस्कृतीच्या संशोधनाच्या प्रातांत माझे पूर्वसुरी वि. का. राजवाडे ते रा. चिं. ढेरे अशा अनेकांचे योगदान आहे. लोकसाहित्य म्हणजे अडाणी लोकांचे साहित्य असा समज या लोकांनी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. मीही त्यांच्या ग्रंथांचे वाचन करून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला. खरे तर अनाक्षर लोकांनी लोकसाहित्य निर्माण केले. आपल्याकडे एका मोठ्या जनसमूहाला लिहिण्या-वाचण्यापासून वंचित ठेवले. त्यांना अनाक्षर ठेवले गेले. अडाणी लोकांचे साहित्य हा शिक्‍का केवळ मराठीतच नव्हे तर जगभरातील लोकसाहित्याबाबत मारला गेला.

तिथल्या संशोधक-अभ्यासकांनी तो पुसला. मीदेखील लोकसाहित्याच्या सैद्धांतिक अभ्यासाचा प्रयत्न केला. हा अभ्यास मराठीपुरता न करता कन्नड-तमीळ सारख्या अन्य प्रादेशिक भाषांच्या अभ्यासातून केला. गेली ५५ वर्षे मी सांगलीत राहते. हा प्रदेश कर्नाटक-गोवा सीमेवरचा असल्याने मला या प्रदेशात जाऊन लोकसाहित्यात डोकावता आले. आद्य नाटककार विष्णुदास भावेंनीही कन्नड नाटकाच्या प्रभावातून मराठी नाटक केले. त्यांच्या नाटकांचा पहिल्यांदा अभ्यास केला. ते नाटक लोकरंगभूमीतून उत्क्रांत होते गेले. गोवा, कर्नाटक, तमिळनाडू असा मोठा पैस मला इथे उपलब्ध झाला.’’

Dr. Tara Bhavalkar
शालेय गणवेशाची बिले काढण्यासाठी 80 हजारांची घेतली लाच; जिल्हा समन्वयक, सहनियंत्रक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

लोकसंस्कृती गंगेच्या प्रवाहासारखी

प्रा. भवाळकर म्हणाल्या, ‘‘लोकसंस्कृती टिकविली पाहिजे, असे म्हटले जाते तेव्हा ते अत्यंत चुकीचे विधान असते. मुळात काही टिकवायचे म्हणून टिकत नसते. लोकसंस्कृती तर गंगेच्या प्रवाहासारखी असते. तो समूहमनाचा आविष्कार असतो. त्यातून ती टिकते. संस्कृतीच्या प्रवाहातील काही गोष्टी टिकतात, काही जुन्या नव्याने तयार होतात. बऱ्याचदा काही सत्ताधारी त्यात बदलाचा हेतुपूर्वक प्रयत्न करतात. मात्र, जे समूहमन स्वीकारते ते टिकते. ते गंगेच्‍या प्रवाहाप्रमाणे असते.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.