Basket Bridge Case
Basket Bridge Caseesakal

Basket Bridge Case : 'तुम्हाला नितीन गडकरींचा अपमान करायचा आहे का?' असं का म्हणाले धनंजय महाडिक?

बास्केट ब्रिज या संकल्पनेची राजकारणातून खिल्ली उडवली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प मंजूर केला.
Published on
Summary

''पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीवरील पूल पिलरचा करायचा आहे. त्याचा नवा आराखडा केला जाणार आहे.''

कोल्हापूर : बास्केट ब्रिजची (Basket Bridge) वर्कऑर्डर निघून काही महिने झाले, तरी अद्याप काम सुरू नाही. या कामात राजकारण सुरू आहे का? या ब्रिजचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले होते. तुम्हाला त्यांचा अपमान करायचा आहे का?, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी येथे जिल्हा प्रशासनाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धारेवर धरले.

याच बैठकीत इचकरंजीतील पाणी प्रश्नावर आमदार प्रकाश आवाडेही (MLA Prakash Awade) आक्रमक झाले. इचलकरंजीला पाणी मिळावे, अशी तुमची इच्छा नाही, असा आरोप त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या या बैठकीत आवाडे आणि महाडिक यांनी विविध प्रश्नांवर जाब विचारला.

बैठकीत नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांनी बास्केट ब्रिजचा विषय उपस्थित केला. वर्कऑर्डर मिळूनसुद्धा अजून काम कसे सुरू झालेले नाही, असे त्यांनी विचारले. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘बास्केट ब्रिज या संकल्पनेची राजकारणातून खिल्ली उडवली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प मंजूर केला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बास्केट ब्रिजचे भूमिपूजन केले. त्यानंतर निविदा निघाली, वर्कऑर्डरही मिळाली, तरी अद्याप ब्रिजच्या कामाला सुरुवात झालेली नाही.’’

Basket Bridge Case
Palkhi Sohala : डोक्यावर टोपी अन् हातात टाळ घेऊन अजितदादांनी पायी चालत पालखी सोहळ्यात घेतला सहभाग; मार्गात कडक पोलिस बंदोबस्त

प्रशासन पण यात राजकारण करत आहे का? केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करूनही काम सुरू होत नाही. तुम्हाला केंद्रीय मंत्री गडकरी यांचा अपमान करायचा आहे का, असा खरमरीत सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी केला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीवरील पूल पिलरचा करायचा आहे. त्याचा नवा आराखडा केला जाणार आहे. त्यामुळे हे काम थांबले आहे, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. यावर दोन्ही ब्रिज वेगळे आहेत. त्यामुळे त्यांचे आराखडे वेगळे आहेत. आवश्यक ते बदल करून त्वरित काम सुरू करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामासाठी व अन्य ब्रिजसाठी एक सल्लागार नेमावा. त्यामुळे दिल्लीमधून निधी आणता येईल, असे महाडिकांनी सांगितले.

आवाडेंचा पालकमंत्र्यांवर निशाणा

इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून पालकमंत्र्यांवर निशाणा साधताना श्री. प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘इचलकरंजीला पाणी मिळावे, अशी आमची इच्छा आहे; पण तुमची इच्छा नाही. त्यामुळे आम्हाला सर्व परवानग्या मुख्यमंत्र्यांकडून आणाव्या लागतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रश्नाचे काही घेणे-देणे नाही. जे प्रशासकीय अधिकारी काम करत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.’’ इचलकरंजी शहरात पाण्याच्या सहा टाक्या मंजूर झाल्या आहेत. त्याचे पुढे काय झाले, असा सवालही आवाडे यांनी विचारला. टाक्यांसाठीची निविदा काढली आहे; मात्र लोकसभेच्या आचारसंहितेमुळे काम थांबले होते. आता निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.