''हिंदूस्थानचे नाव मोदीच जगभरात करतील. ३७० कलम रद्द केले. पाकव्याप्त काश्मीरही परत घेतील.’’
इस्लामपूर : ‘‘देशाला म्लेंच्छ बाधा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार सोडून गांधीवादी विचार आत्मसात केल्याने देश नरक झाला आहे. या परिस्थितीत शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजेंचे विचारच देशाला तारतील. भगवा ध्वज राष्ट्रध्वज झाला पाहिजे,’’ असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले.
पेठ (ता. वाळवा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. राजमाता कल्पनाराजे भोसले व भिडे यांच्या हस्ते अनावरण झाले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख, सी. बी. पाटील, माजी सरपंच मीनाक्षी महाडिक, कपिल ओसवाल, केदार नलवडे प्रमुख उपस्थित होते.
भिडे म्हणाले, ‘‘देशातील अन्य राज्यांकडे पाहा. एकता, एकरुपता हे नातं प्रत्येक राज्याला आहे. मात्र देशाचा तोंडावळा केवळ छत्रपतींच्या महाराष्ट्रालाच आहे. हिंदू म्हणून जगायचे असेल तर अन्न, पाणी, निवाऱ्यासह छत्रपती हृदयात पाहिजेत. हे राष्ट्रउभारणीचे काम आहे. हिंदूस्थानचे नाव मोदीच जगभरात करतील. ३७० कलम रद्द केले. पाकव्याप्त काश्मीरही परत घेतील.’’
सम्राट महाडिक म्हणाले, ‘‘सर्वांसाठी आजचा दिवस सुवर्ण दिवस आहे. स्वप्न साकार होत आहे, याचा आनंद आहे. तांत्रिक अडचणी व सत्ताबदलामुळे पुतळा उभारण्याचे काम रखडत गेले. लोकवर्गणीतून पुतळा उभारत आहे. त्यासाठी अनेकांचे योगदान मिळाले.’’
अण्णासाहेब डांगे म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या हृदयात छत्रपतींचे विचार रुजावेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.’’ धनपाल माळी यांनी स्वागत केले. सत्यजित मस्के यांनी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रोहित पाटील, सचिव राहुल पाटील, शंकर पाटील, विकास दाभोळे, रघुनाथ कदम व कार्यकर्त्यांनी संयोजन केले.