‘फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट' पूर्ण करण्याचे नूतन खासदारांसमोर आव्हान! धैर्यशील मोहिते पाटलांना सोडवावे लागणार कृष्णा-भीमा स्थिरीकरण, लोहमार्ग, दुष्काळ, बेरोजगारीचे प्रश्न

बलाढ्य भारतीय जनता पक्षाशी दोन हात करून माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजयश्री खेचून आणली. मात्र मोहिते पाटील यांची खरी कसोटी आगामी काळात लागणार आहे.
solapur
Dhairyashil Mohite Patilsolapur madha loksabha
Updated on

सोलापूर : बलाढ्य भारतीय जनता पक्षाशी दोन हात करून माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजयश्री खेचून आणली. मात्र मोहिते पाटील यांची खरी कसोटी आगामी काळात लागणार आहे. कारण ज्यांच्याविरोधात दोन हात केले, त्याच भाजपचे केंद्रात सरकार आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवरील विकास कामे मार्गी लावण्यासाठी ते कसा मार्ग काढतात, हे पहावे लागेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वलयाचा फायदा त्यांना निश्चितपणे होऊ शकतो, त्यासाठी त्यांना तशी इच्छाशक्ती दाखवावी लागेल.

दुष्काळी भागातील अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा पाणीप्रश्‍नाबरोबरच नियमित किसान रेल्वे, कुर्डुवाडी रेल्वे कारखाना, पर्यटन, रेल्वे उड्डाणपूल, फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट (स्थिरीकरण), नीरा-देवघर प्रकल्प पूर्ती, टेंभू व म्हैसाळ दोन्ही उपसा सिंचन प्रकल्पांतून अधिकचे तीन टीएमसी पाणी, रखडलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना अशा विविध कामांना गती देण्यासाठी केंद्राबरोबरच राज्य पातळीवर पाठपुराव्याची गरज आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी पाणीप्रश्‍नावर शरद पवार यांच्याविरोधात रान पेटविले होते. नीरेचे पाणी ‘टेल एंड’ला देण्यात मोहिते-पाटलांचा अडथळा असल्याचा आरोप होतो, ती प्रतिमा बदलावी लागेल. राज्यभरात नावलौकीक असलेल्या मोहिते-पाटील कुटुंबीयांचे संस्थात्मक पातळीवरील काम मोठे आहे. पण अलिकडील काळात ते टिकवून ठेवण्यात आलेले अपयश दूर करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील अभ्यासू आणि विकासासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून जातेगाव-टेंभूर्णी महामार्गाचे काम रखडल्याने या मार्गावरील अपघातात दोनशेपेक्षा जास्त जीव गेले आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांची मानाची पालखी याच मार्गावरून जाते. जेऊर-आष्टी या लोहमार्गाला मंजुरी मिळून अनेक वर्षे झाली, मात्र अद्याप या कामाला सुरुवात झाली नाही. हा मार्ग अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी चौंडी गावावरून जात असल्याने याला विशेष महत्त्व आहे.

लक्ष्यवेधी...

  • जेऊर-आष्टी लोहमार्गाची पूर्तता

  • उजनीतील पर्यटनासाठी केंद्राचा निधी

  • बेरोजगारी हटविण्यासाठी मोठ्या उद्योगांची उभारणी

  • स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना

  • फलटण-बारामती रेल्वे, लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे, नीरा-भीमा स्थिरीकरण, नीरा-देवघर धरणाच्या पाण्यासाठी जलवाहिनी, फलटणभोवती रिंग रोड

  • फळपीक प्रक्रिया उद्योगांची उभारणी

  • प्रदूषणविरहित भीमा नदीसाठी केंद्रातून निधी

सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी...

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी विजयसिंहे मोहिते पाटील यांचा पुढाकार होता. आता ‘फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट' नावाने पुढे आलेल्या या योजनेसाठीही आग्रह सार्थ ठरेल. ५५ हजार कोटींच्या या योजनेच्या निधीसाठी केंद्राच्या जलशक्ती विभागाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. कृष्णेचे पुराचे पाणी निरा-भीमा-सीना या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी २० हजार कोटींच्या योजनेला तत्वतः मान्यता दिल्याचे जाहीर झाले आहे. निरा-देवधरसाठी तीन हजार ९७६ कोटींच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन काम सुरु केले आहे. या प्रकल्पातून माळशिरस तालुक्यातील वंचित अशा २२ गावांसाठी काम होण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. राज्य सरकारबरोबर केंद्रातून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केल्यास सिंचन क्षमतेत वाढ होईल.

रेल्वेच्या कामाची मोठी संधी

ब्रिटीश काळात म्हणजे १९१८ मध्ये मंजूर झालेल्या लोणंद-फलटण -पंढरपूर लोहमार्गाच्या रेल्वे स्टेशन, गोदामे, कामगारांच्या वसाहतीसाठी भूसंपादन झालेले आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ५०-५० टक्के निधीची तरतूद केली आहे. त्यासठी राज्य शासनाने ११९७ कोटींची तरतूद केली असून तो प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लावून त्याच्या दुहेरीकरणासाठी प्रयत्न करावे लागतील. सध्या लोणंद-फलटण मार्गावर रेल्वे सुरू झाली आहे. या २६ किलोमीटरसाठी सिग्नलिंग व मनुष्यबळाअभावी ८० मिनिटे लागतात. या मार्गावर सिग्नलिंग व्हावे आणि मनुष्यबळ मिळावे. फलटण-पुणे-मुंबई रेल्वे सुरू व्हावी. कुर्डुवाडी रेल्वे कारखान्यामध्ये मालगाडीच्या बोगींचे (पीओएच) काम सुरु आहे. पण ते कमी असल्याने नवी भरती नाही. प्रवासी कोचचे काम मिळाल्यास कामगारांची संख्या वाढून रोजगार उपलब्ध होईल. कुर्डुवाडी रेल्वे कारखान्यात निर्माण करण्यात आलेल्या नेरळ-माथेरान कोचमुळे कारखान्याला पारितोषिक मिळून शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला होता. हे नेरळ-माथेरान कोच निर्मितीचे काम कुर्डुवाडी कारखान्यातून दुसरीकडे नेण्यात आले. ते परत मिळण्याची अपेक्षा आहे. कुर्डुवाडीजवळील चिंकहिल येथील रेल्वे सुरक्षा बल केंद्र नाशिकला स्थलांतरित करण्यात आले. ते पुन्हा परत मिळवावे लागेल. रेल्वे गेट क्रमांक ३८ बंद केल्याने कुर्डुवाडीचे दोन भाग झाले. या गेटवरुन उड्डाणपुलाची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com